Ind vs Eng : चेन्नईतील पराभवासाठी BCCI ने 'या' व्यक्तीला दिली शिक्षा; संघानंही केलेली तक्रार

India vs England, Chennai Test : भारतीय संघाला चेन्नईत तब्बल २२ वर्षांनंतर कसोटी पराभवाला सामोरं लागल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) देखील आता कामाला लागलं आहे. चेन्नईतील भारताच्या पराभवानंतर बीसीसीआयनं पहिली कारवाई केलीय. जाणून घेऊयात...

इंग्लंड (England) विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला (Team India) तब्बल २२७ धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवानंतर भारतीय संघाला टीकेला सामोरं जावं लागत आहे.

दुसरीकडे बीसीसीआयने (BCCI) सर्वांना बुचकळ्यात टाकणारा निर्णय घेतलाय.

बीसीसीआयने चेन्नई कसोटीतील भारताचा पराभवानंतर चेन्नईच्या खेळपट्टीच्या क्युरेटरचं निलंबन केलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी आता चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियमच्या (MA Chidambaram Stadium) अशा एका क्युरेटरकडे जबाबदारी देण्यात आलीय की ज्याला अद्याप प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांसाठीही खेळपट्टी तयार केलेली नाही.

चेन्नई कसोटीत पहिल्या दोन दिवसांत फिरकीपटूंना अजिबात मदत मिळत नव्हती. त्यामुळे इंग्लंडने ५७८ धावा केल्या होत्या. तर तिसऱ्या दिवशी खेळपट्टीचा नूर पालटला होता. फिरकीपटूंना चांगली मदत मिळाली आणि भारतीय संघ स्वस्तात बाद झाला.

भारतीय संघाच्या खेळाडूंकडूनही खेळपट्टीबाबत बीसीसीआयकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

पहिल्या कसोटीतील भारताच्या पराभवानंतर चेन्नईच्या खेळपट्टीचे मुख्य क्यूरेटर तपोश चॅटर्जी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना आता विजय हजारे करंडक सामन्यांसाठीचं काम पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चेन्नईच्याच स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी आता स्थानिक क्रिकेट ग्राउंडमॅन व्ही. रमेश कुमार यांच्याकडे खेळपट्टीची जबाबदारी देण्यात आली आहे. व्ही.रमेश कुमार यांच्याकडे आंतरराष्ट्रीय सामन्यासाठीची खेळपट्टी तयार करण्याचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्या निवडीबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

भारतात अनेक दिग्गद पीज क्यूरेटर उपलब्ध असताना अनुभव नसलेल्या व्यक्तीला क्यूरेटर म्हणून नेमल्याच्या बीसीसीआयच्या निर्णयामागचं नेमकं कारण काय? हे कोडं अद्याप उलगडू शकलेलं नाही.