Union Budget 2022: देशाचा अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर होणार? मोदी सरकारने आतापर्यंत केले ‘हे’ बदल; पाहा, वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 11:13 AM2022-01-12T11:13:09+5:302022-01-12T11:17:23+5:30

Union Budget 2022: मागील काही वर्षात अर्थसंकल्पाबाबत मोदी सरकारने अनेक सुधारणा केल्या आहेत.

कोरोनाचा कहर अद्यापही शमलेला दिसत नाही. दुसऱ्या लाटेतून हळूहळू देश सावरत असताना आता ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धुमाकूळ देशभरात सुरू असल्याचे दिसत आहे. कोरोनाचे रुग्णही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अशातच पुन्हा एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चर्चा सुरू होऊ लागल्याचे सांगितले जात आहे. (union budget 2022 date)

दुसरीकडे, देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या एकूणच पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थसंकल्पाचे वेध आता लागले आहे. यंदाच्या वर्षी सामान्यांना बजेटमधून दिलासा मिळणार का, काय स्वस्त होणार, काय महागणार, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे.

तसेच विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारला आगामी अर्थसंकल्पात कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. येत्या १ फेब्रुवारी २०२२ रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत.

आर्थिक वर्ष २०२२-२३ रोजीसाठी बजेट सादर केले जाणार असून, या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सीतारामन आणि पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उद्योजकांशी बैठकांचा धडाका सुरु आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्थेने जोरदार कमबॅक केला होता.

अर्थचक्राला मिळालेली बळकटी आणि कर महसुलात झालेली वाढ सरकारसाठी दिलासा देणारी आहे. मात्र अजूनही देशातील करोना संकट दूर झालेले नाही. त्यामुळे आरोग्य क्षेत्राला बूस्टर डोस देण्यासाठी आणि त्यातील पायाभूत सेवा सुविधा सुधारण्यासाठी सरकारला पुन्हा एकदा सढळ हाताने मोठी तरतूद कारवाई लागेल.

मागील काही वर्षात अर्थसंकल्पाबाबत मोदी सरकारने अनेक सुधारणा केल्या आहेत. ज्यात सर्वात प्रथम सरकारने बजेट सादर करण्याची वर्षानुवर्षे चालत आलेली तारीख बदलली.

तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी २८ फेब्रुवारी ऐवजी १ फेब्रुवारी रोजी बजेट सादर करण्याची प्रथा सुरु केली. संसदेत बजेट सादर करण्याची तारीख बदलण्यात आली असली तरी त्याची वेळ मात्र कायम ठेवण्यात आलेली आहे.

१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्थमंत्री लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतात. वर्ष २०२१ पासून आणखी एक बदल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ई-अर्थसंकल्प अर्थात टॅबलेट स्वरुपात आणला होता.

त्याशिवाय खासदारांना देखील बजेटची ई काॅपी देऊन छपाईच्या खर्चात बचत केली होती. वर्ष २०२० मध्ये केंद्र सरकारने अर्थसंकल्प दस्ताचे नाव वही-खाते नाव दिले होते. तसेच पूर्वी ज्यापद्धतीने ब्रिफकेसमध्ये बजेट आणले जात होते ती पद्धत बदलून त्याऐवजी लाल कपड्यात लपेटून अर्थसंकल्पाचा दस्त आणण्यात आला होता.