Ganesh Festival 2021: गणपती बाप्पाने वाहन म्हणून मूषकाचीच निवड का केली? पाहा, नेमके कारण, मान्यता व कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 02:53 PM2021-09-12T14:53:45+5:302021-09-12T15:02:47+5:30

Ganesh Festival 2021: गणपतीचे वाहन मूषक का झाला, त्याबद्दल विविध प्रकारच्या कथा प्रचलित आहेत.

गणपतीचे केवळ नाव घेतले की, नवचैतन्य आणि उत्साह सळसळतो. गणेशविषयीच्या अनेक गोष्टी रंजक, अद्भूत आणि थक्क करणाऱ्या आहेत. गणपतीच्या स्वरुपाचीही अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात. गणपती हा अबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटतो.

यंदाच्या वर्षी शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ पासून गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे, त्याचबरोबर बुद्धीची देवताही आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत.

गणपतीच्या प्रतीकांमागे विशिष्ट अर्थ दडलेला आहे. गणपती म्हटले की, गजमुख, लंबोदर, शूर्पकर्ण, मोदक, मूषक अशा अनेक गोष्टी पटकन लक्षात येतात. मूषक आणि गणपतीच्या अनेक कथाही आपण ऐकल्या, वाचल्या आहेत. मात्र, या गोष्टींमागे नेमकी कारणे असल्याचे सांगितले जातात. मूषक दिसला की, अनेकांना ते आवडत नाही. मात्र, महाकाय गणपतीचे वाहन म्हणून मूषकाची निवड कशी झाली? जाणून घेऊया...

गणपतीचे वाहन म्हणून मूषक प्रसिद्ध आहे. खरे म्हणजे उंदराप्रमाणे मोर हेदेखील गणपतीचे वाहन आहे. पण गणपतीच्या मूर्तीपाशी जशी मूषकाची लहानशी मूर्ती ठेवली जाते. किंबहुना तशी ती ठेवली जाणे, अत्यावश्यक मानले जाते. मोर हे गणेशाचे वाहन आहे हे लक्षात घेऊन गणपतीला मोरेश्वर, मयुरेश्वर अशी विविध नावेही दिलेली आढळतात. तरीही गणपतीचे मूषक वाहन अधिक प्रसिद्ध आहे.

आता एवढासा मूषक त्याच्यावर महाकाय देहाचा लंबोदर गणपती स्वार होणार कसा आणि स्वार झाला तरी गणपतीला पाठीवर घेऊन मूषक धावणार तरी कसा, असा प्रश्न सर्वांसमोर असतो. मात्र, मूषक गणपतीचे वाहन कसे झाले, याबद्दल एक कथाही आढळून येते.

गणपतीचे वाहन मूषक का झाला, त्याबद्दल विविध प्रकारच्या कथा रूढ आहेत. त्यांपैकी एक कथा अशी की, क्रौंच नावाचा एक गंधर्व इंद्रसभेत उपस्थित असतांना चुकून त्याचा पाय वामदेवाला लागला. रागावलेल्या वामदेवाने तू मूषक होशील, असा त्याला शाप दिला. त्या शापाप्रमाणे क्रौंच गंधर्व मूषक झाला आणि त्याच रूपात थेट पराशरमुनींच्या आश्रमात दाखल झाला.

त्याने आश्रमात जेवढे काही खाण्यासारखे होते, ते सर्व खाऊन टाकले, जे खाण्यासारखे नव्हते ते कुरतडून टाकले. त्याचा हा धुडगूस असह्य होऊन पराशरमुनींनी त्यापासून मुक्तता करावी, अशी श्रीगणेशाला प्रार्थना केली. पराशरमुनींची प्रार्थना स्वीकार करून प्रत्यक्ष गणराय तेथे प्रकट झाले आणि त्यांनी आपला सर्वसमर्थ पाश मूषकावर टाकला.

गणपतीचाच पाश तो, त्यामधून मूषकाची सुटका झाली नाही. मूषक तेवढ्यापुरता गणपतीला शरण आला. प्रसन्न झालेल्या गणपतीने उंदराला वर मागण्यास सांगितले. मात्र, मूषक गर्वाने आंधळे झाले होते. त्यांनी उलट गणपतीलाच सांगितले की, तुला काय हवे असेल तर मला सांग, मी तुझ्यापाशी वर मागणार नाही.

उंदराचे हे बोलणे ऐकून गणेशाने मुत्सद्दीपणाने मूषकाला सांगितले की, मी तुझ्याकडे वर मागतो. तू आजपासून माझे वाहन हो. मूषकाला आपल्या गर्विष्ठपणाचा पश्चात्ताप झाला. पण त्याचा उपयोग झाला नाही. गणपतीचे वाहन होण्याशिवाय मूषकाला गत्यंतर उरले नाही. गणपतीच्या प्रचंड देहाचे ओझे पाठीवर बाळगत त्याला सर्वत्र वावरावे लागले.

मूषक हा शेतीचा नाश करणारा आहे. गणपती हा शेतकऱ्यांचा देव मानला जात असल्यामुळे त्याने मूषकाला आपल्या अंकित करून घेतले आहे, असेही एक मत किंवा एक तर्क या विषयात सांगितला जातो. गणपती हा शेतकऱ्यांचा देव आहे, याचे स्पष्टीकरण देताना गणपतीचे शूर्पकर्ण म्हणजे सुपासारखे कान ही शेतकऱ्याची दोन सुपे आहेत आणि गणपतीची सोंड ही भाताच्या लोंब्यांसारखी आहे, असे मानले जाते.

गणपती हे सूर्याचेही एक रूप असून, तो दिवसाचा सूर्य म्हणून रात्रीवर आरूढ झाला आहे आणि मूषक हा रात्री सर्वत्र संचार करीत असल्यामुळे रात्ररूपी उंदरावर गणेशरूपी सूर्य आरूढ झाला, असाही एक मतप्रवाह असल्याचे सांगितले जाते. मूषक हा थोड्याच दिवसात वा कालावधीत फार मोठ्या संख्येने वाढू शकतो.

मूषकाच्या जातीची वाढ फार झपाट्याने होते. त्याचप्रमाणे दूर्वेसारखी खूप वाढणारी वनस्पती गणपतीने आपली मानली आणि झपाट्याने संख्या वाढविणाऱ्या मूषकाला त्याने आपले वाहन केले, असेही सांगितले जाते. मूषक प्रत्येक गोष्ट कुरतडून पाहतो. तेव्हा ती गोष्ट कामाची आहे वा नाही, ते तपासून पाहतो. समाजात प्रत्येक गोष्टीवर टीका करणाऱ्या अनेक वृत्ती आपणास दिसतात. अशा प्रवृत्तीवर नियंत्रणासाठी मूषक. म्हणजेच विवेकाचा अविवेकावर विजयाचे द्योतक आहे, असे मानले जाते.