'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 10:27 AM2024-05-24T10:27:17+5:302024-05-24T10:28:45+5:30
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या २ टप्प्यातील प्रचार सुरू आहे. ४ जूनला देशाच्या तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हाती असतील याची प्रतिक्षा सर्वांना लागून राहिली आहे.
![Lok Sabha elections - BJP's vote percentage and seats will also increase compared to last time - S Jaishankar | 'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक Lok Sabha elections - BJP's vote percentage and seats will also increase compared to last time - S Jaishankar | 'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/s-jaiashankzcuew_2024051236769.jpg)
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
नवी दिल्ली - सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे भाजपाच्या मतांमध्ये प्रत्येक निवडणुकीत वाढ होतेय. २००९ मध्ये मतांची टक्केवारी १९ टक्के होती. २०१४ मध्ये हा आकडा ३४ टक्क्यांवर आला. २०१९ च्या निवडणुकीत ३७.५ टक्के मते भाजपाला मिळाली. यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी ४२ टक्के किंवा त्याहून अधिक वाढतील. मी १२ राज्यांचा दौरा केला आहे. सर्व क्षेत्रातील विविध वयातील लोकांसोबत बोललोय. भाजपाचं ३७० चं टार्गेट सहज आलं नाही. त्यामागे विचार आणि विश्लेषण केलंय असं केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं.
एस जयशंकर म्हणाले की, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये मतांची टक्केवारी आणि लोकसभेच्या जागा वाढतील. भाजपा अत्यंत प्रोफेशनल आणि गांभीर्याने विचार करणारा पक्ष आहे. केवळ अंदाज लावत नाही. भाजपा त्यांच्या मतदारसंघात बूथपर्यंत आढावा घेते. आमची रणनीती बूथवरील फॅक्टसवर असते. त्यामुळे जर कुणी काही विशेष राज्यात मते आणि जागा वाढतील बोलत असेल तर त्यावर विश्वास करू शकतो असं लॉजिक त्यांनी मांडलं.
तसेच पंतप्रधान मोदींनी ४०० पार नारा असाच दिला नाही. काहीतरी विचार असेल, अनेक अशी राज्यं आहेत जिथे भाजपा त्यांची ताकद आणखी मजबूत करणार आहे. आम्हाला मागच्या वेळी जितक्या जागा मिळाल्या त्याहून अधिक जागा तिथे मिळतील. बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, यूपी आणि तामिळनाडू या राज्यात आमच्या जागांमध्ये वाढ होईल असा विश्वास एस जयशंकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, एकीकडे भारताच्या विकासाचं स्वप्न आम्ही दाखवत आहोत तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील पक्ष लोकांच्या मनात भीती निर्माण करत आहेत. मोदी सरकारच्या मागील १० वर्षात फक्त ट्रेलर होता आणि हे विधान हलक्यात कुणी घेऊ नये. जनतेसमोर भाजपाच्या १० वर्षाचा रेकॉर्ड आहे आणि भविष्यातील सकारात्मक प्रतिमा आहे. त्यामुळे आम्हाला किती जागा मिळतील याचा आकडा मी सांगू शकत नाही परंतु तो नक्कीच जास्त असेल असं आत्मविश्वासानं मी सांगू शकतो असंही एस जयशंकर यांनी म्हटलं.