Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 16:03 IST2024-05-03T15:56:20+5:302024-05-03T16:03:37+5:30
Lok Sabha Election 2024 Smriti Irani And Rahul Gandhi : अमेठीच्या खासदार आणि भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे.

Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
काँग्रेसने अमेठीतून किशोरीलाल शर्मा आणि रायबरेलीमधून राहुल गांधी यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी राहुल गांधी अमेठीतून निवडणूक न लढवत असल्याने भाजपाने काँग्रेस पक्षावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. आता अमेठीच्या खासदार आणि भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. गांधी परिवाराने अमेठीतून निवडणूक न लढवल्याने काँग्रेस पक्षाने निवडणुकीपूर्वी मतं न पडताच अमेठीतील पराभव स्वीकारल्याचे संकेत असल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेसने शुक्रवारी सकाळी यादी जाहीर केली आणि अमेठी आणि रायबरेलीमधील उमेदवारांची घोषणा केली. काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून केएल शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली. आतापर्यंत राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवत असत, पण यावेळी पक्षाने त्यांची जागा बदलली आहे. याबाबत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल यांचा पराभव करणाऱ्या स्मृती इराणी यांनी गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला आहे.
स्मृती इराणी यांनी गांधी कुटुंबाला टोला लगावला आणि म्हणाल्या, "पाहुण्यांचे स्वागत आहे. पाहुण्यांचं स्वागत करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. गांधी कुटुंबाने अमेठीतून निवडणूक न लढवणे हे काँग्रेस पक्षाने निवडणुकीपूर्वी मतं न पडताच पराभव स्वीकारल्याचे संकेत आहेत."
"2019 मध्ये अमेठीच्या जनतेने राजकीय रणांगणात गांधी परिवाराचा त्याग केला होता. आज गांधी कुटुंब अमेठी लोकसभा मतदारसंघातून न लढणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विकासाचे संकेत आहेत. त्या विकासाच्या माध्यमातून अमेठीतील जनता विचारत आहे की, भाजपाच्या खासदाराने 5 वर्षात अमेठीत अभूतपूर्व विकास करणे शक्य आहे तर 50 वर्षे, विशेषत: 15 वर्षे बेपत्ता राहिल्यानंतर, इतक्या पिढ्याचं नुकसान गांधी कुटुंबाने अमेठी लोकसभा मतदारसंघात का केलं?" असंही स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.