लोकसभा नाही, निदान केंद्रात मंत्रीपद, विधानसभेला १० जागा द्याव्यात; रामदास आठवलेंची नवी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 14:21 IST2024-04-10T14:20:51+5:302024-04-10T14:21:17+5:30
आम्हाला जरी जागा मिळाली नाही तरी आम्ही महायुती सोबत आहोत. देशात एनडीएसोबत असणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

लोकसभा नाही, निदान केंद्रात मंत्रीपद, विधानसभेला १० जागा द्याव्यात; रामदास आठवलेंची नवी मागणी
केंद्रीय मंत्री रामदास आठवले गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपावर टीका करत होते. त्यांनाच भाजपाने महायुतीमध्ये लोकसभेची जागा दिलेली नाही. आठवलेंनी भाजपाकडे दोन जागा मागितल्या होत्या. यापैकी शिर्डी जागेसाठी आजही आग्रही असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यात प्रत्येक टप्प्यात दोन सभा होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाची भुमिका आहे की, केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री पद मिळावे. ऐन निवडणुकीत भुमिका बदलणे अतिशय अयोग्य आहे. आम्हाला जरी जागा मिळाली नाही तरी आम्ही महायुती सोबत आहोत. देशात एनडीएसोबत असणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी हे देशातली लोकशाही बळकट करत आहेत. जनता दलाच्या काळातही पर्याय निर्माण झाला होता. इंडिआ आघाडी नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचे काम करत आहे. संविधान बदलणार या अफवा आहेत, असे आठवले म्हणाले.
लोकसभेला जागा दिली नाही. परंतु विधानसभेत 8 ते 10 जागा मिळतील याबाबत चर्चा केली जाईल. गेल्या वेळी आमचे सरकार नव्हते. यामुळे रिपाईला मंत्रिपद नव्हते. काँग्रेसच्या काळात डॉ. बाबासाहेबांच्या इंदू मिलचे काम केले गेले नाही. काँग्रेस पक्ष रसातळाला जात असून त्याला वर यायला खूप वेळ लागेल, असेही आठवले म्हणाले.