“PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय”; सुप्रिया सुळेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 14:32 IST2024-10-31T14:32:33+5:302024-10-31T14:32:57+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आर आर आबा हे इमानदार होते. अजित पवारांची फायनल चौकशी ही देवेंद्र फडणवीस यांनीच लावली, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

“PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय”; सुप्रिया सुळेंचा टोला
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाला वेग आला आहे. लवकरच सर्व पक्षांचा प्रचाराचा धडका सुरू होणार आहे. महाराष्ट्रात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकूण ८ प्रचार सभा घेणार आहेत. त्याखालोखाल देशाचे गृहमंत्री अमित शाह हे २० प्रचार सभांना हजेरी लावणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक टोला लगावला आहे.
केंद्रात २०१४ पासून मंत्री असलेला मराठमोळा चेहरा नितीन गडकरी हे संपूर्ण राज्यात एकूण ४० सभा घेणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा सध्या राज्य भाजपाचा चेहरा आहेत. त्यामुळे ते सर्वाधिक ५० प्रचार सभा घेणार आहेत. तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ४० प्रचार सभा घेणार आहेत. याशिवाय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील तब्बल १५ प्रचारसभांना संबोधित करतील अशी माहिती आहे. भाजपाने प्रचाराची मोठी तयारी केली आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी टोलेबाजी केली.
PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७ ते ८ सभा घ्याव्या लागतात हे महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेचा विजय आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. तसेच अजित पवार यांनी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. आर आर आबा हे इमानदार होते. अजित पवारांची फायनल चौकशी ही देवेंद्र फडणवीस यांनीच लावली. गेल्या चार पाच दिवसांत ज्या घटना घडत आहेत, त्याचे मूळ देवेंद्र फडणवीस आहेत, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला.
दरम्यान, पहिला आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहास्तव चौकशी केली. गेलेल्या माणसाबद्दल बोलणे योग्य नाही. आमच्यावर चांगले संस्कार आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.