काँग्रेस नगरसेवक भाजपासोबत येऊ इच्छितात; महापौर करण्यासाठीच्या हालचालींना वेग, नेते मुंबईत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 11:47 IST2026-01-27T11:45:53+5:302026-01-27T11:47:22+5:30
Municipal Election 2026 Mayor: काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी आता भाजपाने महापौर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

काँग्रेस नगरसेवक भाजपासोबत येऊ इच्छितात; महापौर करण्यासाठीच्या हालचालींना वेग, नेते मुंबईत!
Municipal Election 2026 Mayor: २९ महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाने राज्यभरात घवघवीत यश मिळवले. यानंतर आता या महापालिकांमध्ये महापौरपदासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच महापौर कुणाचा बसवायचा, यावरूनही अनेक महापालिकांमध्ये रस्सीखेंच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच उद्धवसेना आणि भाजपा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी आता भाजपाने महापौर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मोठा ट्विस्ट! उद्धवसेना-भाजपा एकत्र येणार? अडीच वर्ष महापौर पद मिळणार? मुंबईत घडामोडींना वेग
यंदाच्या चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने कमबॅक करत ६६ पैकी २७ जागांवर विजय मिळवला. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस बहुमताच्या जवळ आहे. असे असले तरी आता काँग्रेस सत्तेपासून दूर राहू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आता चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसविरोधात उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी, दोन अपक्ष नगरसेवक आणि भाजपा यांची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत भाजपा नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी काँग्रेसचा गट भाजपासोबत येऊ इच्छितो, असा दावाही केला.
काँग्रेस नगरसेवक भाजपासोबत येऊ इच्छितात
काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. काँग्रेसच्या काही नगरसेवकांची भाजपा सोबत येण्याची इच्छा आहे. शिवाय चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर बसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धवसेनेला उपमहापौर पद आणि दोन वर्ष स्थायी समितीसाठी आम्ही तयार होतो. मात्र, अचानक काय झाले, माहिती नाही, त्यांनी महापौरपदाची मागणी केली आहे. त्यामुळे या अनुषंगानेही संवाद सुरू आहे. सध्या चर्चा सुरू आहे. या चर्चेत यश आले तर निश्चित महापौर आमचाच होईल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, उद्धवसेना आणि वंचितसोबत संवाद सुरू आहे. या त्यांच्यातील संवादात एका फेरी तर अंतिम टप्प्यातही गेली होती. चंद्रपूर जिल्ह्याने खूप भोगले आहे. हा जिल्हा खूप मागे होता. गेल्या दहा वर्षात या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आम्ही फार प्रयत्न केले, पूर्ण शक्तीने काम केले. माझ्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यात आमचा महापौर झाला तर जिल्ह्यात अजून २३-२४ प्रोजेक्ट आहे ते सुरळीत झाले पाहिजे. त्यासाठी आमचे प्रयत्न आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आता मुंबईत येऊन नेते चर्चा करणार असल्याचे म्हटले जात आहे.