“आम्हाला दोष देऊ नका, काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की…”; चंद्रपूर प्रकरणी संजय राऊतांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 14:02 IST2026-02-11T14:02:34+5:302026-02-11T14:02:51+5:30
Sanjay Raut News: काँग्रेस पक्ष विस्कळीत झालेला आहे. सर्वाधिक नगरसेवक असूनही सत्ता आणू शकले नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली.

“आम्हाला दोष देऊ नका, काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की…”; चंद्रपूर प्रकरणी संजय राऊतांची टीका
Sanjay Raut News: चंद्रपूर महापालिकेत २७ नगरसेवक असलेल्या काँग्रेसचा गटबाजीने महापौरपदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. भाजपाने थेट उद्धवसेनेच्या पाठिंब्याने पालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळविले. भाजपाच्या संगीता खांडेकर यांनी अवघ्या एका मताने काँग्रेसच्या वैशाली महाडुळेंचा पराभव करत महापौरपदी विजय मिळवला. उपमहापौरपदासाठी उद्धवसेनेचे प्रशांत दानव व काँग्रेस समर्थित पप्पू देशमुख यांना समसमान ३२ मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीने दानव यांची निवड झाली. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, २७ नगरसेवक चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही, याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत भाजपाला मदत करायची नाही. आपण एका वेगळा भूमिकेत आहोत. विरोधी पक्षात बसावे लागले तरी हरकत नाही. तरीही काँग्रेसच्या घोळामुळे स्थानिकांनी निर्णय घेतला. मुंबईत यासंदर्भात चर्चा करण्यात येईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तुमच्यात एकवाक्यता नव्हती
काँग्रेस पक्ष विस्कळीत झालेला आहे. सर्वाधिक नगरसेवक असूनही सत्ता आणू शकले नाहीत, याची काँग्रेसला लाज वाटायला हवी. चंद्रपूर येथे असे का घडले, याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. आम्हाला दोष देण्यात अर्थ नाही. तुमच्याकडे सर्वाधिक नगरसेवक होते. वंचित, एमआयएम यांनी तुम्हाला पाठिंबा दिला नाही, कारण तुमच्यात एकवाक्यता नव्हती. तुमच्या दोन गटात भानगडी सुरू राहिल्या. त्यामुळे इतर पक्ष तुम्हाला पाठिंबा देणार होते, त्यांना तटस्थ राहावे लागले आणि वेगळा निर्णय घ्यावा लागला, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सोबतच राहण्याचे निर्देश होते. त्यानुसारच आम्ही काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होतो. त्यांनी जिथे म्हटले तिथे चर्चेसाठी गेलो. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबतच आम्ही चर्चा करत होतो. पण आम्हाला शिवसेनेची गरज नाही असे त्यांचे मत होते. आमचा वारंवार अपमान केला जात होता. तो आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवला. त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही हा निर्णय घेतला. शेवटी पक्ष टिकला पाहिजे, कार्यकर्ते टिकले पाहिजे हीच भावना होती, अशी प्रतिक्रिया उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी दिली.