“...तर किमान ५ हजारांनी पराभव करु”; २०८ मतांनी विजयी झालेल्या नाना पटोलेंना भाजपाचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 15:28 IST2024-12-10T15:27:42+5:302024-12-10T15:28:35+5:30
Maharashtra Vidhan Sabha Assembly Election 2024 Result: स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले असताना फक्त २०८ मतांनी विजय मिळाला आणि तोच त्यांच्या जिव्हारी लागला, अशी टीका भाजपाने केली आहे.

“...तर किमान ५ हजारांनी पराभव करु”; २०८ मतांनी विजयी झालेल्या नाना पटोलेंना भाजपाचे आव्हान
Maharashtra Vidhan Sabha Assembly Election 2024 Result: या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभावला सामोरे जावे लागले. यानंतर महाविकास आघाडीने पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले आणि ईव्हीएमविरोधात तीव्र निषेध नोंदवला. इतकेच नाही तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच अवघ्या २०८ मतांनी विजयी झालेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाने आव्हान दिले आहे.
मारकडवाडी येथील ईव्हीएम विरोधातील आंदोलनाला महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली. खुद्द शरद पवार यांनी या ठिकाणी जाऊन महायुतीवर टीका केली. शरद पवार यांच्या सभेनंतर भाजपाकडून महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्ह विरुद्ध जनजागृती केली जात आहे. भाजपा नेतेही या गावात जात आहेत. या छोट्याशा गावात सध्या शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. यातच नाना पटोले यांना विरोधात निवडणूक लढवणाऱ्या भाजपा उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी आव्हान दिले आहे.
...तर किमान ५ हजार मतांनी पराभव करु
नाना पटोले यांनी साकोली मतदारसंघातून राजीनामा देऊन मत पत्रिकेवरील निवडणुकीत पुन्हा उतरावे. ईव्हीएमनंतर त्यांचा मतपत्रिकेवरही किमान ५ हजार मतांनी पराभव करून दाखवू. नाना पटोले यांना असे वाटत आहे की, ईव्हीएममुळे त्यांचा निसटता विजय होऊ शकला आहे. अन्यथा ते मोठ्या मताधिक्याने जिंकले असते. तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मतदान पत्रिकेवरील निवडणूक लढवून दाखवावी. मुळात नाना पटोले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असताना आणि त्यांनी स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले असताना ही त्यांचा फक्त २०८ मतांनी निसटता विजय झाला आणि तोच त्यांच्या जिव्हारी लागल्यामुळे ते ईव्हीएम विरोधात नाहक ओरड करत असल्याची टीका अविनाश ब्राह्मणकर यांनी केली.
दरम्यान, ईव्हीएम विरोधात खोटे आरोप करणाऱ्या नाना पटोले यांनी लक्षात ठेवावे की, ईव्हीएमच्या मतांमध्ये मागे राहून ते टपाली मतांच्या जोरावर जिंकले आहे. एका प्रकारे जनतेच्या मतदानात त्यांचा पराभव झाला आहे. तोच पराभव लपवण्यासाठी आणि प्रतिमा जपण्यासाठी नाना पटोले ईव्हीएमला दोष देऊन आपल्या पराभवावर पांघरून टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, या शब्दांत अविनाश ब्राह्मणकर यांनी हल्लाबोल केला. ते एबीपीशी बोलत होते.