“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:01 IST2025-06-24T18:59:48+5:302025-06-24T19:01:20+5:30
BJP Replied To Congress Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघात तब्बल १ लाख ०४ हजार ६०४ मतदार वाढल्याचा दावा भाजपाने केला आहे.

“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
BJP Replied To Congress Rahul Gandhi: विधानसभा निवडणूक होऊन आता अनेक महिने लोटले तरी, काँग्रेससह विरोधी पक्षाचे निवडणूक प्रक्रियेत घोळ झाल्याचे दावे अद्यापही करताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढलेल्या मतदारांबाबत आरोप केले. या आरोपांना भाजपाकडून उत्तर दिले जात आहे.
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
राहुल गांधी म्हणतात की, देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात ८ टक्के वाढ झाली. जरा राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघात काय झाले होते ते बघूयात. राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघात २०१९ मध्ये १३,५७,८१९ मतदार होते. तर, २०२४ मध्ये याच मतदारसंघातील मतदारांची संख्या १४,६२,४२३ एवढी झाली. म्हणजेच १,०४,६०४ एवढे मतदार वाढले, ज्याची टक्केवारी काढल्यास ७.७ टक्के अशी येते. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात २०१९ मध्ये ३,८४,३५५ मतदार होते. २०२४ मध्ये मतदारांची संख्या ४,११,२४१ एवढी झाली. म्हणजेच २६,८८६ एवढे मतदार वाढले. याची टक्केवारी ६.९९ टक्के एवढी येते. ही आकडेवारी निवडणूक आयोगाच्या स्रोताची आहे.
वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?
वायनाडमध्ये झालेली वाढ “लोकशाही” आणि महाराष्ट्रात झाली की ती “चोरी”? हा कुठला न्याय आहे? महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नागपूर सारख्या भागांत स्थलांतर आणि नवमतदारांमुळे ५ ते ८ टक्के मतदारवाढ होतेच. त्यामुळे राहुल गांधींचा आरोप म्हणजे निव्वळ दुटप्पीपणाचा नमुना आहे. आपल्या मतदारसंघात मतदार वाढली तर जागरूक मतदार आणि महाराष्ट्रात मतदार वाढले तर बनावट मतदार? Vote Theft नाही, Truth Theft सुरु आहे. आणि राहुल गांधी त्याचेच प्रमुख शिल्पकार आहेत. बाकी तुमच्या नेतृत्वात काँग्रेसचा किती टक्के निवडणुकीत पराभव झाला याची तपशीलवार आकडेवारीही जाहीर करून टाका!, असा खोचक टोला लगावण्यात आला आहे. भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी आता असा दावा केला आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात मतदानाच्या आधी शेवटच्या पाच महिन्यांत अचानक आठ टक्के मतदार वाढले. मतदानाच्या दिवशी अनेक बूथवर अचानक २० ते ५० टक्के मतदार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची तक्रार केली असून, ज्यांच्या पत्त्यांची पडताळणी झालेली नाही, असे हजारो मतदार प्रसारमाध्यमांनी शोधून काढले आहेत. या सगळ्यावर निवडणूक आयोग मौन बाळगून आहे. निवडणूक आयोग या घोटाळ्यात सहभागी आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. असे अनेक घोळ समोर येत आहेत. ही एक प्रकारची मतांची चोरी आहे. मात्र निवडणूक आयोग व सरकार हे सगळं झाकण्याचा प्रयत्न करत आहे. हीच त्यांची कबुली नव्हे का? म्हणूनच आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार याद्या आणि मतदानाचं सीसीटीव्ही फूटेज प्रसिद्ध करण्याची मागणी करत आहोत, असे राहुल गांधी यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.