Kolhapur Municipal Election 2026: अठरा वर्षानंतर महाडिक घराण्याचे कोल्हापूर महापालिकेवर वर्चस्व
By भारत चव्हाण | Updated: February 4, 2026 13:24 IST2026-02-04T13:21:17+5:302026-02-04T13:24:12+5:30
२००७ मध्ये सत्तांतर झाले आणि आमदार सतेज पाटील - मंत्री हसन मुश्रीफ यांचे पर्व सुरू झाले होते

Kolhapur Municipal Election 2026: अठरा वर्षानंतर महाडिक घराण्याचे कोल्हापूर महापालिकेवर वर्चस्व
भारत चव्हाण
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात महाडिक घराण्याने १८ वर्षानंतर दमदार एंट्री केली असून या घराण्याच्या शब्दाला महत्त्व आल्याचे महापालिका निवडणुकीत उमेदवार निश्चित करताना तसेच महापौरपदाचे उमेदवार निश्चित करताना दिसून आले. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा राज्यव्यापी कारभार पाहता पुढील पाच वर्षे महानगरपालिका भाजपचे अर्थातच खासदार धनंजय महाडिक यांचे वर्चस्व राहणार आहे.
भारतीय जनता पक्षाने २०१५ च्या निवडणुकीत १४ नगरसेवक निवडून आणले होते, यावेळच्या निवडणुकीत ही संख्या २४ पर्यंत वाढविण्यात भाजपने आपली सर्व ताकद लावली होती. काहीही करून महापौर भाजपचेच करायचे असा निर्धार करून त्यांनी सगळी यंत्रणा त्या दिशेने कामाला लावली होती. त्यात ते यशस्वीही झाले. महायुतीत त्यांच्या सर्वाधिक जागा जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळे भाजपचेच पहिले महापौर होणार हे स्पष्टच झाले होते. पण महापौर कोण होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित होता. तोही आता संपला आहे.
२०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने निवडून येणार नाहीत अशा कार्यकर्त्यांसाठी आग्रह धरला होता. धनंजय महाडिक यांनी हा आग्रह चुकीचा असल्याचे भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते. पण मंत्री पाटील यांनी त्यांचा आग्रह सोडला नाही. ज्या जागांवर उमेदवार निवडून येणार नाहीत असे सांगितले गेले होते तेथे भाजप उमेदवारांचे पराभव झाले आणि सत्तेपर्यंत पोहोचण्यास काही जागा कमी पडल्या. भाजप-ताराराणी आघाडीने तेव्हा ३३ जागा जिंकल्या होत्या.
भाजप नेत्यांनी २०१५ मध्ये जी चूक केली तशीच चूक २०२५ च्या निवडणुकीत पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेतली. ज्या ज्या जागा वाटून घेतल्या तेथील सर्वाधिक उमेदवार हे महाडिक गटाचे आहेत. मूळ भाजपचे फार कमी आहेत. त्यामुळेच महापौरपदाचे उमेदवार ठरविताना मंत्री पाटील यांना महाडिक हेही भाजपचे मूळ कार्यकर्तेच झाल्याचे सांगावे लागले. मूळ भाजपच्या काही कार्यकर्त्यांचा पराभव झाला, तर काही जणांनी निवडणुकीला उभे राहण्याचेही धाडस केले नाही.
महाडिकांकडून बेरजेचे राजकारण
मंत्री पाटील यांनी धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील यांना पक्ष म्हणून निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. महाडिक यांनीही बेरजेचे राजकारण करत जे निवडून येणार नाहीत, त्यांना थांबायला सांगितले. त्याचा परिणाम भाजपचे संख्याबळ वाढण्यावर, महापौर होण्यावर झाला. १९९० पासून महाडिक घराणे महापालिका राजकारणात आहे. त्यानंतर २००७ मध्ये सत्तांतर झाले आणि आमदार सतेज पाटील - मंत्री हसन मुश्रीफ यांचे पर्व सुरू झाले. अठरा वर्षाच्या विजनवासानंतर महाडिक यांनी पुन्हा महापालिका राजकारणात थेट प्रवेश केला असून आता त्यांच्या शब्दाची किमतही वाढली आहे. कारण महापौरपदी निवड होणाऱ्या रूपाराणी निकम या त्यांच्याच कार्यकर्त्या आहेत.