४७८३ रुपयांची शिफारस, मिळाले फक्त २३६९! धान उत्पादक शेतकऱ्यांची केंद्र सरकारवर नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:42 IST2025-05-30T16:40:33+5:302025-05-30T16:42:41+5:30

२२ वर्षांत धानाच्या हमीभावात केवळ १८१९ रुपयांची वाढ : खर्च झाला तिप्पट

Recommendation of Rs 4783, only 2369 received! Paddy farmers unhappy with central government | ४७८३ रुपयांची शिफारस, मिळाले फक्त २३६९! धान उत्पादक शेतकऱ्यांची केंद्र सरकारवर नाराजी

Recommendation of Rs 4783, only 2369 received! Paddy farmers unhappy with central government

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
केंद्र सरकारने बुधवारी (दि. २८) १४ प्रमुख पिकांचे हमीभाव जाहीर केले. त्यात धानाच्या हमीभावात ६९ रुपयांनी वाढ केली. धानाला आता प्रति क्विंटल २३६९ रुपये हमीभाव मिळणार आहे. सन २०२५-२६ करिता कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे धानाला प्रति क्विंटल ४७८३ रुपये हमीभाव मिळण्याची शिफारस केली होती. पण, त्या तुलनेत मात्र धानाला अर्थाच हमीभाव मिळाला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत धानाला मिळणारा हमीभाव कमी असल्याने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 


पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या पाच जिल्ह्यांत धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. या पाचही जिल्ह्यांत धानाचे १७ लाख हेक्टरवर क्षेत्र आहे. धानाच्या लागवड खर्चात दरवर्षी वाढत होत असून, त्या तुलनेत धानाला मिळणारा दर हा कमी असल्याने धानाची शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सौदा होत चालला आहे. त्यामुळेच धान उत्पादक शेतकरी आता इतर पीक घेण्याकडे वळत असल्याचे चित्र आहे.


गेल्या २२ वर्षांत धानाच्या हमीभावात केवळ १८१९ रुपयांची वाढ झाली असून, उत्पादन खर्च मात्र तिप्पट वाढला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२४-२५ खरीप हंगामातील धानाच्या हमीभावात १८३ रुपयांनी वाढ केली होती. त्यामुळे धानाला प्रति क्विंटल २३०० रुपये हमीभाव मिळाला. सन २०२५-२६ करिता कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे धानाला ४७८३ रुपये हमीभाव मिळण्याची शिफारस केली. पण, प्रत्यक्षात केंद्र सरकारने केवळ ६९ रुपयांची वाढ केली आहे.


खते, बियाण्यांच्या किमती झाल्या दुप्पट
धानशेतीच्या लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खते, बियाणे, मजुरी व इतर खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. २० वर्षापूर्वी धानाच्या शेतीचा एकरी लागवड खर्च १२ ते १३ हजार रुपये होता. तो आता २२ ते २५ हजारांवर पोहोचला आहे. पण, त्या तुलनेत हमीभाव मिळत नसल्याने
शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.


"धानाच्या लागवड खर्चात पाचपट वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातसुद्धा वाढ झाल्याने त्याचासुद्धा परिणाम लागवड खर्चावर होत आहे. त्यामुळे धानाच्या हमीभावात भरीव वाढ होणे अपेक्षित होते."
- चिंतामण रहांगडाले, धान उत्पादक शेतकरी.


"धानाच्या शेतीचा एकरी लागवड खर्च २२ ते २५ हजार रुपये आहे. तर एकरी १५ ते १८ क्विंटल धानाचे उत्पादन होते. सर्व खर्च जाता शेतकऱ्यांच्या हातात केवळ तीन ते चार हजार रुपये शिल्लक राहतात. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा?"
- मन्साराम चिखलोंढे, शेतकरी

Web Title: Recommendation of Rs 4783, only 2369 received! Paddy farmers unhappy with central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.