आज ‘एक अलबेला’ प्रदर्शित
By Admin | Updated: June 24, 2016 06:20 IST2016-06-24T03:02:10+5:302016-06-24T06:20:27+5:30
ना मी भगवानदादांसारखा दिसतो, ना नर्तक आहे... नाचण्याशी माझा छत्तीसचा आकडा आहे... भगवानदादांची भूमिका साकारण्यासाठी अपार मेहनत घेतली

आज ‘एक अलबेला’ प्रदर्शित
ना मी भगवानदादांसारखा दिसतो, ना नर्तक आहे... नाचण्याशी माझा छत्तीसचा आकडा आहे... भगवानदादांची भूमिका साकारण्यासाठी अपार मेहनत घेतली; पण ज्या वेळी मी रिहर्सल करायचो, त्या वेळी खरे असे वाटायचे, की भगवानदादांनीच माझ्याकडून सर्वोत्तम काम करवून घेतले, अशी भावना अभिनेते मंगेश देसाई यांनी व्यक्त केली. ‘एक अलबेला’ या आज (२४ जून) प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटानिमित्त देसाई यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली, तेव्हा ते बोलत होते. त्यांनी ‘लोकमत’मधील सहकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधून सर्व प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. ते म्हणाले, ‘‘एक अलबेला’ हा चित्रपट ‘अलबेला’चा रीमेक नव्हे. एक साध्या भगवान आबाजी पालव नावाच्या माणसापासून तो ‘भगवानदादा’ कसा घडला, या प्रवासाचे चित्रण या सिनेमात आहे. लोकांना भगवानदादांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात आलेली हलाखी, त्यांचा मृत्यू याविषयी बरीच माहिती असते; पण त्यांच्याविषयीच्या सकारात्मक बाबी अद्याप समाजासमोर आल्याच नाहीत. दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी या भूमिकेसाठी निवडले, तेव्हा मला आश्चर्य वाटले. मी भगवानदादांसारखा दिसत नाही; मात्र प्रख्यात मेकअपमन विद्याधर भट्टे यांनी अक्षरश: करामत घडवली आणि मी भगवानदादा बनलो.’’ या चित्रपटाद्वारे विद्या बालन मराठी चित्रपटात पदार्पण करीत आहे. याविषयी देसाई यांनी सांगितले, की या सिनेमाला विद्या बालनने होकार दिला, यावर कित्येक दिवस माझा विश्वास बसत नव्हता. माणसे उगीच मोठी होत नाहीत. एवढ्या मोठ्या सुपरस्टार असूनही विद्या यांचा नम्रपणा खरोखर वाखाणण्याजोगा आहे. एकदा शूटिंगला रात्रीचे अडीच वाजले, तरी त्यांच्या चेहऱ्यावर जराही नाराजी नव्हती. भगवानदादांची भूमिका साकारणे हे माझ्यासमोर मोठे आव्हान होते; पण खुद्द भगवानदादांनीच मला ऊर्जा दिली. सन १९९६मध्ये माझी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली होती. त्या वेळी त्यांना मी नमस्कार केल्यावर ते माझ्याकडे पाहत राहिले होते... माझ्याकडे त्यांनी असे का पाहिले, हे तेव्हा लक्षात आले नाही.. आज त्याची लिंक लागते आहे.. कदाचित त्यांना तेव्हाच या सिनेमाची चाहूल लागली असावी, अशी भावनाही देसाई यांनी व्यक्त केली.