'आई तुळजाभवानी' मालिकेमध्ये येतोय जगदंबा आणि महादेव यांच्या भेटीचा दैवी क्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 18:22 IST2025-11-17T18:21:46+5:302025-11-17T18:22:04+5:30
Aai Tuljabhavani : ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सुरू असलेल्या अद्वितीय पर्वाचा महत्त्वाचा टप्पा आगामी भागात पाहायला मिळणार आहे. देवी जगदंबा आणि महादेव यांच्या दैवी भेटीचा हा अलौकिक क्षण आहे.

'आई तुळजाभवानी' मालिकेमध्ये येतोय जगदंबा आणि महादेव यांच्या भेटीचा दैवी क्षण
कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सुरू असलेल्या अद्वितीय पर्वाचा महत्त्वाचा टप्पा आगामी भागात पाहायला मिळणार आहे. देवी जगदंबा आणि महादेव यांच्या दैवी भेटीचा हा अलौकिक क्षण आहे. आगामी भागांमध्ये भक्ती, शक्ती आणि नियतीचा महासंगम जो केवळ प्रसंग नाही, तर एक गूढ आध्यात्मिक अनुभूती अनुभवायला मिळणार आहे.
एका प्राचीन गुफेत देवी जगदंबा आणि नंदी प्रवेश करतात. ही तीच जागा आहे जिथे अनेक जन्मांपूर्वी देवीने स्वतःच्या हस्ते महादेवाची पिंड स्थापित केली होती. स्मृती हरवलेल्या अवस्थेत जगदंबा त्या स्थळाशी पुन्हा जोडली जाते, आणि त्या क्षणी तिच्या व महादेवांच्या आत्म्यांतील दैवी नात्याची पुनर्जागृती होते. जगदंबा भक्तिभावाने पूजनास आरंभ करते. तिच्या प्रत्येक अर्पणातून त्रिपुंड लावणे, फुलांची माळ वाहणे, बेलपत्र अर्पण करणे, दूधाभिषेक या सर्वांमधून कैलासावर महादेवाशी एक अदृश्य संवाद घडतो. त्यातून नेमके काय घडणार, याची उत्सुकता निर्माण करणारा हे नाट्यमय भाग आहेत. या दैवी संगमाचा साक्षीदार ठरतो यदु बाबा. त्याला जाणवतं की जगदंबाच्या मनात शिवतत्त्वाचं बीज रोवलं गेलं आहे. ''साऱ्या गोंधळाचा बसतोय मेळ... सुरू झाला नियतीचा खेळ,'' नियती आता या बीजाला खतपाणी घालणार का, की कुणाची दृष्ट या दिव्य बंधाला लागणार, हा प्रश्न उभा राहतो.
सुप्रसिद्ध अभिनेते राजेश देशपांडे यांचा मुलगा सृजन देशपांडे महादेवांच्या रूपात दिसणार आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, "दोन वर्षांनी पुन्हा मालिका करतो आहे, आणि त्यातहि माझी मुख्य भूमिका असलेली माझी ही पहिलीच मालिका आहे. माझी पहिलीवहिली पौराणिक मालिका असल्याने मला वेगळी तंत्र शिकण्याची संधी मिळाली आहे. मी या मालिकेत शिव म्हणजेच महादेवांच्या रूपात दिसणार आहे. माझे वडील राजेश देशपांडे यांच्याकडून मला सातत्याने अनुभवाचे धडे शिकायला मिळत आहेत. कुठेही काम करत असताना मला कधीच कामाबद्दल मार्गदर्शन करत नाही, त्याचा असा समाज आहे की ज्या दिगदर्शकाखाली मी काम करत आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी काम करायला हवं. त्याने सांगितलेले एक वाक्य कायम माझ्या स्मरणात आहे, "तू नम्र राहिलास तर लोक तुझे फंबल देखील पचवतील. म्हणून मी कायम हे आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. जरी मी राजेश देशपांडे यांचा मुलगा असलो तरीदेखील मी ऑडिशन देऊनच काम मिळवलं आहे. मला खात्री आहे प्रेक्षकांचे मला देखील प्रेम मिळेल, माझे बाबा नेहेमी म्हणतात फार फार तर काय होईल सुपरहिट होईल."