अखेर सावी-धैर्यची सात जन्मासाठी 'जुळली गाठ गं'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 19:59 IST2025-08-14T19:59:13+5:302025-08-14T19:59:42+5:30
Julali Gath Ga Serial : 'जुळली गाठ गं' या मालिकेत सावी-धैर्य यांचा शाही विवाहसोहळा पार पडत आहे. सावी घरच्यांचा विरोध पत्करून धैर्य बरोबर लग्न करण्यासाठी तयार होते.

अखेर सावी-धैर्यची सात जन्मासाठी 'जुळली गाठ गं'
'सन मराठी'वरील 'जुळली गाठ गं' (Julali Gath Ga Serial) या मालिकेत सावी-धैर्य यांचा शाही विवाहसोहळा पार पडत आहे. सावी घरच्यांचा विरोध पत्करून धैर्य बरोबर लग्न करण्यासाठी तयार होते. दामिनीही सावीचा सून म्हणून स्वीकार करते. सावी-धैर्य या दोघांच्या आयुष्यात बरीच वळणं आली आधी भांडण आणि आता आयुष्यभरासाठी ते दोघे एकत्र आहेत. प्रेक्षकवर्ग या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतs. लग्नानंतर सावीचं आयुष्य असंच आनंदी असेल की पुन्हा तिला कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागेल? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
नुकताच या विवाह सोहळ्याचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला. मुजुमदारांच्या घरात अगदी थाटात हा विवाह सोहळा पार पडत आहे. मुख्य म्हणजे सावी- धैर्य यांचे खास लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या विवाह सोहळ्याबद्दल सावी म्हणजेच अभिनेत्री पायल मेमाणे म्हणाली की, "अखेर प्रेक्षकांचा आवडता क्षण जवळ आला आहे. मालिकेच्या पहिल्या भागापासून तुमची लव्हस्टोरी कधी सुरु होणार? त्यानंतर तुमचं लग्न कधी होणार? असे बरेच प्रश्न प्रेक्षक आम्हाला विचारायचे. प्रोमो पाहून पुन्हा प्रेक्षकांकडून सावी- धैर्यला शुभेच्छा मिळाल्या आहेत. मालिकाविश्वात पहिल्यांदाच मी लग्नाचं शूट करत आहे. त्यामुळे नवरीसारखं नटणं, मेहंदी काढणं, हातात हिरवा चुडा हे सगळं मी अनुभवत आहे. दररोज वेगवेगळे लुक्स, खूप सारे सीन करून धमाल आली. पण या सगळ्यात पडद्यामागची धावपळ, मेहनत देखील जवळून पहिली आहे. गेले १०-१२ दिवस आम्ही शूट करत आहोत. बरेचदा खूप शूट करून थकवा जाणवला पण प्रेक्षकांचं प्रेम, सेटवरील प्रत्येक माणसाची ऊर्जा पाहून काम करायला आणखी मज्जा आली."
"सावीच्या प्रेमाने धैर्य पूर्णपणे बदलला"
धैर्य म्हणजेच अभिनेता संकेत निकम म्हणाला की, "सावीच्या प्रेमाने धैर्य पूर्णपणे बदलला आहे. तेव्हापासून धैर्य प्रेक्षकांना आणखी आवडू लागला. सध्या मालिकेत लग्न सोहळा पार पडत आहे. शूटिंग करताना पूर्ण युनिटने प्रचंड धमाल केली. मेहंदी, हळद आणि लग्न शूट करताना नेहमी मागे गाणं लावलं जायचं त्यामुळे काम करायला आणखी प्रसन्न वाटायचं. मुख्य म्हणजे हळदीचे सीन शूट करताना पॅकअप नंतर सेटवर एकमेकांना हळद लावून मालिकेच्या संपूर्ण टीमने डान्स केला. या सगळ्या दिवसात सेटवर उत्साहाचं वातावरण होतं. प्रत्येकजण फोटोशूट, रिल्स आणि शूटिंग करण्यात व्यस्त होते. त्यामुळे लग्नाचं शूटिंग संपूच नये असं वाटलं. पण या लग्नानंतर प्रेक्षकांना आणखी धमाल येणार आहे. लग्नानंतर मालिकेत बरेच ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळतील."