सुशांत, क्रितीच्या पुनर्जन्माला आॅक्सिजनची गरज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 15:59 IST2017-06-11T03:00:17+5:302023-08-08T15:59:43+5:30
‘कॉकटेल, लव्ह आजकल, फाइंडिंग फॅनी आणि बदलापूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये निर्माता म्हणून काम करणाऱ्या दिनेश विजान यांनी ‘राब्ता’ या चित्रपटातून दिग्दर्शन

सुशांत, क्रितीच्या पुनर्जन्माला आॅक्सिजनची गरज!
- सतीश डोंगरे
हिंदी चित्रपट - राब्ता
‘कॉकटेल, लव्ह आजकल, फाइंडिंग फॅनी आणि बदलापूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये निर्माता म्हणून काम करणाऱ्या दिनेश विजान यांनी ‘राब्ता’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. पुनर्जन्माचा जुनाच फॉर्म्युला घेऊन त्यांनी चित्रपटाला धार देण्याचा प्रयत्न केला; मात्र यापूर्वी आलेल्या ‘करण-अर्जुन, कर्ज’, सूर्यवंशम आणि ओम शांती ओम’ या चित्रपटांसारखा ‘राब्ता’मध्ये ताळमेळ दाखविण्यात ते फारसे यशस्वी होताना दिसत नाहीत. कारण पुनर्जन्म दाखविताना कथेत दमदारपणा नसल्याची क्षणाक्षणाला जाणीव होते. परंतु अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती
सॅनन यांच्यातील रंगलेली
केमिस्ट्री चित्रपटाला काहीसा आधार देते.
चित्रपटाची कथा एका पंजाबी दिलफेक तरुणाच्या एंट्रीने सुरू होते. शिव कक्कड (सुशांत सिंग राजपूत) नावाच्या या तरुणाला हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे बॅँकर म्हणून नोकरी मिळते. तिथे त्याची भेट शायरा (क्रिती सॅनन) नावाच्या तरुणीशी होते. शायराचे त्या ठिकाणी चॉकलेट शॉप असते. पहिल्याच भेटीत शिव तिच्या प्रेमात पडतो. काही भेटींनंतर दोघांनाही एकमेकांची कंपनी आवडायला लागते. पुढे ते एकमेकांशी लग्न करण्याचा विचार करतात; मात्र या दोघांमध्ये खलनायक म्हणून जाकिर मर्चंटची (जिम सरभ) एंट्री होते. जाकिर हा मोठा व्यापारी असतो. त्याचदरम्यान शिवला बॅँकर्स कॉन्फरन्सनिमित्त सात दिवसांसाठी वियना येथे जावे लागते. ही संधी साधून जाकिर शायराशी जवळीकता साधतो. शायरालाही त्याची कंपनी आवडते. अशात तो तिचे अपहरण करतो. येथूनच पुनर्जन्माची कथा सुरू होते.
वास्तविक शायराला सुरुवातीपासूनच एक स्वप्न अस्वस्थ करीत असते. त्या स्वप्नातील प्रश्नांची सर्व उत्तरे तिला जाकिरकडे मिळतात; मात्र शिव तिला शोधून काढतो, पुढे काय होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कारण बॉलीवूडमध्ये पुनर्जन्माचा फॉर्म्युला ठरलेला आहे. ‘गडद अंधार, अर्धवट चेहरे, आरडाओरड, रक्तपात’ असं स्वप्न यातही दाखविण्यात आल्याने कथेत नावीन्यता वाटत नाही. त्यामुळे चित्रपटाचा पहिला हाफ बघण्यातच काहीसे मन रमते. मध्यंतरानंतर मात्र पुनर्जन्माची कथा खूपच कंटाळवाणी वाटते. त्यातच क्रिती आणि सुशांतला महाराणी आणि योद्ध्याच्या भूमिकेत बघणेही जड होते. चित्रपटातील अभिनयाविषयी बोलायचे झाल्यास सुशांतने बाजी मारलेली दिसते, तर क्रिती भावनिक प्रसंग साकारताना कमजोर दिसते. जिम सरभविषयी न बोललेलेच बरे. एक खलनायक म्हणून त्याच्यात कुठलेच गुण दिसत नाहीत. तसेच त्याचा अभिनयही पोरकट वाटतो. दिग्दर्शकाने जिम सरभला या भूमिकेसाठी का निवडले असावे, असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होतो. राजकुमार राव यालाही चित्रपटात फारसे स्थान दिले गेले नाही. खरं तर वयोवृद्ध व्यक्तीच्या मेकअपमध्ये त्याला प्रेक्षकांना ओळखणेच मुश्कील होते.
चित्रपटाची आणखी एक कमकुवत बाजू म्हणजे ही एक प्रेमकथा आहे; मात्र त्यात भावनिक प्रसंगांचीच कमतरता असल्याने प्रेमकथेला फारसे महत्त्व उरत नाही. त्याचबरोबर पुनर्जन्माची कथा दाखविताना पात्रांमध्ये तो भारदस्तपणा अजिबात जाणवत नाही. तसेच टायटल सॉँगमध्ये झळकलेली बॉलीवूडची मस्तानी दीपिका पदुकोण काही काळ प्रेक्षकांना सुखद धक्का देते. परंतु तिची पडद्यावरून एक्झिट कशी होते, हे कळतच नसल्याने दीपिकाच्या चाहत्यांची निराशा झाल्याशिवाय राहत नाही.
चित्रपटाच्या जमेच्या बाजूचा विचार केल्यास लोकेशन्स आणि गाण्यांवर दिनेश विजान यांनी चांगली मेहनत घेतल्याचे दिसून येते. चित्रपटाचे म्युझिकही दमदार आहे. दोन्ही गाणी व टायटल सॉँगचे बोल प्रेक्षकांच्या ओठावर आपसूकच येतात. शिवाय सुशांत आणि क्रिती यांच्यातील संवाद आणि प्रेमळ क्षण प्रेक्षकांना खुर्चीवर बसवून ठेवण्यास भाग पाडतात. त्यामुळे तुम्ही जर या दोघांचे चाहते असाल तर हा चित्रपट बघायला हरकत नाही. परंतु सुशांत आणि क्रिती व्यतिरिक्त चित्रपटात आणखी काही असेल असा विचार कराल तर ती एक रिस्क असेल.