भव्यता व उत्तम अभिनयाचा मजबूत आधार

By Admin | Updated: December 19, 2015 01:37 IST2015-12-19T01:37:00+5:302015-12-19T01:37:00+5:30

संजय लीला भन्साली हिंदी चित्रपटसृष्टीतील असे दिग्दर्शक आहेत जे चित्रपट न बनवता पडद्याला सप्तरंगांनी सजवून टाकतात. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये त्यांनी पडद्यावर चित्रपटाच्या

Strong basis of grandeur and good acting | भव्यता व उत्तम अभिनयाचा मजबूत आधार

भव्यता व उत्तम अभिनयाचा मजबूत आधार

- अनुज अलंकार

हिंदी चित्रपट - बाजीराव मस्तानी

संजय लीला भन्साली हिंदी चित्रपटसृष्टीतील असे दिग्दर्शक आहेत जे चित्रपट न बनवता पडद्याला सप्तरंगांनी सजवून टाकतात. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये त्यांनी पडद्यावर चित्रपटाच्या प्रत्येक रंगाला साकारले आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाची कथा प्रेमाचा त्रिकोण आहे. ती बघताना आपण तिच्यासोबत वाहत जातो व असा अनुभव क्वचित येत असतो.
चित्रपटात दाखविण्यात आलेल्या कथेनुसार मराठी योद्धा बाजीराव पेशवा (रणवीर सिंह) सतत युद्ध जिंकत असतो. परंतु त्याचे हे यश पेशव्यांच्या साम्राज्यात काही जणांना रुचत नसते. बाजीराव आपली पत्नी काशीबाई (प्रियंका चोप्रा) हिला आपली सगळ्यात मोठी शक्ती समजत असतात. बुंदेलखंडला मोगलांच्या सेनेने वेढा घातलेला असतो. तेथील राजाने मुस्लीम महिलेशी लग्न केलेले असते. बुंदेलखंडच्या राजाची मुस्लीम मुलगी मस्तानी (दीपिका पदुकोण) मदतीसाठी बाजीरावकडे हात पसरते. बाजीरावचे सैन्य मोगलांच्या सैन्याला माघारी धाडण्यात यश मिळवते व बाजीरावच्या शौर्यावर मस्तानी खूश होते. बाजीरावही मस्तानीच्या शौर्यावर आणि तिच्या सौंदर्यावर फिदा होतात. मस्तानी बुंदेलखंड सोडून पुण्यात राहायला येते व बाजीराव तिला दुसऱ्या पत्नीचा दर्जा देतात. पेशव्यांच्या मातोश्री आणि भावाला बाजीरावांचा हा निर्णय आवडत नाही. विवाहित बाजीरावांनी मुस्लीम तरुणीला पत्नीचा दर्जा बहाल करावा हे त्या दोघांना रुचत नाही. पुण्यापासून ते साताऱ्यापर्यंत मस्तानीचा अपमान केला जातो, परंतु बाजीरावांचे तिच्यावरील प्रेम कमी होत नाही. काशीबाई आणि मस्तानी दोघीही बाजीरावच्या मुलांची आई बनतात. मस्तानीचा वावर काशीबाईलाही डाचत असतो. बाजीरावांचीही काशीबाई आणि मस्तानी यांच्यात कोंडी होते. पेशव्यांचे कुटुंब मस्तानीला बुंदलेखंडला परत पाठविण्याचा प्रयत्न करतात. मस्तानीवरून बाजीरावांच्या कुटुंबात जोरदार संघर्ष होतो. बाजीराव जेव्हा युद्धाला जातात तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत मस्तानीला बंदिवासात टाकले जाते. यामुळे बाजीरावची हिंमत डळमळते, परंतु मस्तानीवरील त्यांचे प्रेम कधीही कमी होत नाही. बाजीराव व मस्तानी दोघेही आपल्या प्रेमाखातर जीवनाचे बलिदान करतात.
उणिवा : दोष नाहीत, असे म्हणता येणार नाही. चित्रपटाची उत्तम सुरुवात मध्यंतरापर्यंत छान जमली असली तरी त्यानंतर ती तेवढी राहिली नाही. विशेषत: बाजीराव प्रेमाच्या त्रिकोणात अडकल्याचे समोर आल्यानंतर परिस्थितीला अधिक चांगले करता आले असते. परंतु तसे झाले नाही. मध्यंतरानंतर घटनांचा क्रम खूपच लांबला आहे. गीते चांगली असली तर काही गीते चुकीच्या वेळी समोर येतात व पर्यायाने चित्रपटाचा वेग कमी करतात. क्लायमॅक्सही खूपच गुंतागुंतीचा आला आहे.

वैशिष्ट्ये : संजय लीला भन्सालींची दृष्टी आणि कलावंतांचा अभिनय हे या चित्रपटाचा मजबूत आधार आहे. भन्सालींनी इतिहासाच्या ज्या पानांची फारशी माहिती नव्हती त्यांना आपल्या शैलीत पडद्यावर साकारले आहे. चित्रपटाच्या प्रत्येक दृश्याला भव्यदिव्य रूप देण्यात भन्साली व त्यांच्या सहकाऱ्यांनी काहीही उणीव ठेवलेली नाही. दिग्दर्शनाशिवाय त्यांनी संगीताचीही जबाबदारी पार पाडली आहे.
चित्रपटाचे संगीतही सुश्राव्य आहे. पिंगा आणि अलबेला गीते विशेष कौतुकास्पद आहेत. अभिनयाबद्दल सांगायचे तर बाजीरावांची भूमिका रणवीर सिंहने जिवंत केली आहे. आतापर्यंतची ही त्याची सर्वश्रेष्ठ भूमिका आहे.मस्तानी आणि काशीबाई यांच्या भूमिका दीपिका आणि प्रियंका यांनी व्यवस्थित साकारल्या आहेत.
साहाय्यक भूमिकांमध्ये तन्वी आझमी, महेश मांजरेकर, रझा मुराद, आदित्य पांचोली, मिलिंद सोमण, यतीन कार्येकर, वैभव तत्त्ववादी यांनी आपापली कामगिरी चोख बजावली आहे.चित्रपटाला भव्य रूप देण्यात कॅमेरामन सुदीप चॅटर्जी, पार्श्वसंगीत संचित बलहारा, अ‍ॅक्शन मास्टर श्याम कौशल, प्रोडक्शन डिझायनर श्रीराम कानन अय्यंगार, सुजीत सावंत, सलोनी धात्रक, पटकथा लेखक प्रकाश कापडिया यांनी आपापली जबाबदारी पार पाडली आहे.

का पाहावा - भव्यता व कलाकारांचा उत्तम अभिनय.

का पाहू नये - ऐतिहासिक विषयांची आवड नसणाऱ्यांना
कदाचित तो समजणार नाही.
एकूण बाजीराव मस्तानीसारखा चित्रपट बघणे हा वेगळा अनुभव असून त्याच्यासोबत प्रेक्षक जातात. कलाकारांचे काम प्रेक्षकांची हृदये जिंकण्यात यशस्वी ठरले आहे.

Web Title: Strong basis of grandeur and good acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.