फक्त 'ऐ दिल'ला नाही' 'धोनी' चित्रपटालाही बसला फवादमुळे फटका!
By Admin | Updated: October 7, 2016 12:00 IST2016-10-07T11:16:35+5:302016-10-07T12:00:15+5:30
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधातील वातावरण तापल्यामुळे फवाद खानला विरोध होत असून ' एम.एस.धोनी' चित्रपटातील त्याची भूमिका कापण्यात आली.

फक्त 'ऐ दिल'ला नाही' 'धोनी' चित्रपटालाही बसला फवादमुळे फटका!
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - ' उरी' येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधी वातावरण तापलेले असून पाक कलाकार, खेळाडूंना बॅन करण्याची मागणी जोर धरू लागली. सामान्यांसह राजकीय पक्षातील नेतेमंडळीही या मुद्यावर ठाम असल्याने अनेत पाकिस्तानी कलाकारांना गाशा गुंडाळावा लागला. याचा सगळ्यात मोठा फटका फिल्म इंडस्ट्रीला बसला असून पाकिस्तानच्या प्रमुख अभिनेत्यांपैकी एक असलेला फवाद खान याला भारत सोडून पाकिस्तानात परत जावे लागले. तसेच ' ऐ दिल है मुश्किल' या आगामी चित्रपटातील त्याच्या भूमिकेवरही कात्री चालण्याची शक्यता असून त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शनही लांबणीवर पडणार असल्याचे समजते. या निर्णयामुळे दिग्दर्शक करण जोहर आणि चित्रपटात मुख्य भूमिका करणारे रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय यांनाही चांगलाच धक्का बसणार आहे.
- मात्र फवादमुळे झटका बसलेला ' ऐ दिल है मुश्किल ' हा पहिलाच चित्रपट नाहीये. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या आयुष्यावर आधारित 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला बॉक्स ऑफीसवर आणि प्रेक्षकांच्या मनातही चांगले स्थान मिळाले. सुशांत सिंग राजपूतने या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावली आहे. मात्र फवाद खाननेही या चित्रपटात काम केले होते, हे तुम्हाला माहीत आहे का? फवादने चित्रपटात खेळाडू विराट कोहलीची महत्वाची भूमिका बजावली होती. धोनी (सुशांत) आणि विराटमधील (फवाद) यांचे एकमेकांसोबतचे काही महत्वपूर्ण सीनही चित्रीत करण्यात आले होते. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी काही काळ आधीच ' उरी'चा दुर्दैवी दहशतवादी हल्ला झाला आणि देशात पाकविरोधी वातावरण तापले. त्यामुळे दिग्दर्शक नीरज पांडेने सूज्ञपणा दाखवत चित्रटातून फवादची भूमिकाच कापून टाकली. ' मी तसे केले नसते तर या चित्रपटालाही राजकीय व समाजातील इतर क्षेत्रातून विरोध सहन करावा लागला असता' असे नीरजने म्हटले आहे.