दूध आणि केळी खाऊन काढले दिवस!
By Admin | Updated: April 14, 2016 04:10 IST2016-04-14T04:10:40+5:302016-04-14T04:10:40+5:30
अ भिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना बॉलीवूडमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करणारा अभिनेता म्हणजे, रणदीप हुडा. आज रणदीप एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो

दूध आणि केळी खाऊन काढले दिवस!
रणदीप हुडाने ‘सीएनएक्स’शी शेअर केली संघर्षगाथा.
अ भिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना बॉलीवूडमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करणारा अभिनेता म्हणजे, रणदीप हुडा. आज रणदीप एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो, पण त्याची इथपर्यंतची वाट सोपी खचितच नव्हती. ‘स्ट्रगल, टेन्शन आणि स्ट्रेस’ या गोष्टी अभिनेता असूनही रणदीपच्याही वाट्याला आल्या.‘लोकमत सीएनएक्स डिजीटल’च्या एडिटर जान्हवी सामंत यांच्याशी रणदीपने बऱ्याच मनमोकळ्या गप्पा मारल्या, शिवाय त्याच्या स्ट्रगलबद्दल तो भरभरून बोलला. त्याचीच ही संघर्षगाथा....
हायवे, साहेब बीवी और गँगस्टर, मंै और चार्ल्स, सरबजीत या वास्तववादी चित्रपटांतील अनुभव कसा राहिला?
रणदीप : कदाचित माझ्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या ज्ञानामुळे मला हे बहुरंगी, बहुढंगी चित्रपट मिळाले असावेत. हे ज्ञान केवळ जुहू, वांद्रेपर्यंत मर्यादित नव्हते. मी एका लहानशा शहरातून आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक लहान शहरातील चित्रपटाशी निगडित कॅरेक्टरमध्ये मी फिट बसलो. भाषा, देहबोली, शहरे, कथा सगळे बदलू शकते, पण मी त्या पात्रांशी एकरूप होऊ शकलो. दीर्घकाळापासून बॉलीवूड सिनेमा म्हणजे पॉश भागातील कथा असेच समीकरण होते. सुदैवाने हे चित्र बदलले आहे, बदलते आहे. भारतीय सिनेमा आता नव्या स्थित्यंतरातून जात आहे. तो अधिक वास्तववादी होत आहे. या सिनेमात माझे योगदान आहे, याचा मला आनंद आहे.
तू स्वत:च्या यशाकडे कसा पाहतोस?
रणदीप : काही प्रमाणात मी यशस्वी झालो असेल, पण माझ्या मते, हे पुरेसे नाहीच. मी खऱ्या अर्थाने यशस्वी झालोय, असे मला अजिबात वाटत नाही. अपयशापाठोपाठ अपयश अनुभवल्यानंतरही माझ्यातील चिकाटी आणि उत्साह कायम राहिला, ही माझ्यातील चांगली गोष्ट आहे. भूतकाळात मी अनेक खस्ता खाल्ल्या, पण अखेर त्यातून वर आलो. भविष्यातही हा प्रवास सतत सुरू राहावा, असे मला वाटते. ही चिकाटी, ही जिद्द, हा आत्मविश्वास माझ्यालेखी माझे यश आहे. मी यशाचा हा टप्पा गाठू शकतो, हे मला माहिती आहे. कारण मी जे करतो आहे, ते मी आनंदाने करतो आहे.
एक आउटसाइडर म्हणून बॉलीवूडमधील तुझा प्रवास कसा राहिला?
उत्तर : मी रोहटकया लहान शहरातला. बॉलीवूडमधील स्ट्रगलबद्दल सांगायला मला काहीच कमीपणा वाटत नाही. स्ट्रगलच्या काळात मी अनेक दिवस आरे दूध आणि केळी खात काढले आहे. सुरुवातीला मी मुंबईत माझ्या एका मित्राच्या कुटुंबासोबत राहिलो. त्यांच्या लिव्हिंग रूममधील कोचमागे मी झोपायचो. कुटुंबातील सदस्य जागे होण्याआधी मी घराबाहेर पडायचो आणि रात्री उशिरा घरी परतायचो. मॉडेल म्हणून मला मुंबईतील माझी पहिली नोकरी मिळाली, पण निश्चितपणे मी यात समाधानी नव्हतो. शोभेची बाहुले बनण्यात मला जराही रस नव्हता, पण अखेर ‘मान्सून वेडिंग’मध्ये मला अभिनयाची संधी मिळाली आणि बॉलीवूडमधील माझा प्रवास सुरू झाला. अभिनय क्षेत्रातील माझे आदर्श असलेले नसिरुद्दीन शहा यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. माझ्या तुटपुंज्या अभिनयासह मी नसिरुद्दीन साहेबांना सामोरे गेलो, पण त्यांनी मला अनुभवाची मोठी शिदोरी दिली. हा माझ्यासाठी मोठा आणि प्रेरणादायी अनुभव होता.
‘लाल रंग’बद्दल प्रेक्षकांना कुठल्या तीन गोष्टी सांगू इच्छितोस?
रणदीप : ‘लाल रंग’बद्दल सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, पण यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट कुठली, तर ही मैत्रीबद्दलची गडद विनोदी कथा आहे. यात हरयाणवी विनोद आहेत. ही कथा रक्ताच्या अवैध व्यापारासंदर्भात आहे. रक्तदान केल्याने आपण अशक्त होतो वा त्यामुळे आजारी पडू शकतो, असा लोकांचा समज असतो. या गैरसमजापोटी आपल्या देशातील लोक रक्तदान करीत नाही, पण वेळ आली, तर ते खरेदी मात्र करतात. याच मानसिकतेतून रक्ताचा अवैध व्यापार फोफावला आहे. काही थोड्या पैशांसाठी गरिबांकडून रक्त खरेदी करून दलाल ते मोठ्या दरात विकतात. दारूला पैसे मिळावे म्हणून अनेक गरीब लोक आपले रक्त विकतात. पिके बुडाली म्हणून रक्त विकणारे शेतकरीही महाराष्ट्रात आहेत. हा प्रकार निश्चितपणे धोकादायक आहे. समाजासाठी घातक आहे. आम्ही याच विषयावर थोडा-फार प्रकाश टाकू इच्छितो.
- janhavi.samant@lokmat.com