मराठी चित्रपटांचे ‘हब’ पुणे
By Admin | Updated: November 29, 2015 01:49 IST2015-11-29T01:49:41+5:302015-11-29T01:49:41+5:30
पुणे तिथे काय उणे? असे नेहमी म्हटले जाते... ते बरोबरच आहे म्हणा! काही मंडळींना हे जरा खटकू शकते... पण गेल्या काही वर्षांमध्ये पुण्याने हे सिद्धही करून दाखवलं आहे... स्मार्ट शहराच्या

मराठी चित्रपटांचे ‘हब’ पुणे
पुणे तिथे काय उणे? असे नेहमी म्हटले जाते... ते बरोबरच आहे म्हणा! काही मंडळींना हे जरा खटकू शकते... पण गेल्या काही वर्षांमध्ये पुण्याने हे सिद्धही करून दाखवलं आहे... स्मार्ट शहराच्या यादीमध्ये पुण्याचा तर आवर्जून समावेश करण्यात आला आहे... इतकंच काय, गजबज कोलाहलापासून आराम मिळण्यासाठी पुण्यातच स्थायिक होण्याचे प्रमाणही वाढत आहे... आता तुम्ही म्हणाल, एकदम इतर शहरं सोडून पुण्याची तारीफ कशी काय सुरू झाली... म्हणजे प्रयोजन काय? हा प्रश्न पडणं अधिकच स्वाभाविक आहे. तर त्याचे उत्तर आहे, मराठी चित्रपटाचे पुण्याशी जोडले गेलेले अतूट नाते! एक काळ असा होता की, मराठी चित्रपटच काय, पण बॉलीवूडकरांची पंढरी कुठली असेल, तर ती ‘मुंबई’ असेच ऐकायला मिळायचे. त्यामुळे अभिनयात करिअर घडवायचे असेल, तर मुंबई गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. यातच स्टुडिओज, शूटिंगसाठी नरीमन पॉइंट, क्वीन्स नेकलेस, गेट वे आॅफ इंडिया अशी एक ना अनेक लोकेशन्स सहजरीत्या मिळायची. त्यामुळे मुंबईलाच प्राधान्यक्रम दिला जायचा, पण गेल्या काही वर्षांत पुण्यानेही चित्रपटसृष्टीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करायला सुरुवात केली आहे. केवळ शूटिंगसाठीच्या जागाच नाही, तर कथेपासून कलाकारांपर्यंत पुण्याला प्राधान्य दिले जात आहे. इतकंच काय, अगदी पुण्याच्या संस्कृतीचा ठसाही मराठी चित्रपटामध्ये उमटू लागला आहे.
काही वर्षे जरा मागे जाऊ या, पुण्यात घडलेला जोशी-अभ्यंकर खून खटला आठवतोय, या प्रकरणावर १९८६ मध्ये राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘माफीचा साक्षीदार’ या चित्रपटाने रूपेरी पडद्यावर खळबळ उडवून दिली. त्यामुळे पाहता पाहता पुण्याचं नावही चित्रपटसृष्टीच्या नकाशावर नकळतपणे उमटू लागलं. त्यानंतर कमी-अधिक प्रमाणात ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटासह गेल्या २ ते ३ वर्षांतील म्हणाल, तर दुनियादारी, पुणे ५२, मुंबई-पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे मुंबई २, रमा माधव, पुण्याच्या जातकुळीवर आधारित ‘राजवाडे अँड सन्स’ या चित्रपटांमध्येही पुण्याच्या डेस्टिनेशनसह संस्कृतीचे दर्शन प्रेक्षकांना घडले आहे. संजय लीला भन्साळी यांनादेखील पुण्यातील पेशव्यांचा इतिहास ‘बाजीराव मस्तानी’मध्ये दाखविण्याची भुरळ पडणे हेदेखील विशेषच!
कथा-कादंबऱ्यांवर आधारित एखादी चित्रकृती निर्माण करायची असेल, तर त्यात उल्लेख केल्याप्रमाणे वास्तववादी लोकेशन्स दाखविणे क्रमप्राप्त ठरते, म्हणूनच सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ कादंबरीवर बेतलेल्या या चित्रपटात प्रेक्षकांना भांडारकर इन्स्टिट्यूट, कृषी महाविद्यालय, गोखले इन्स्टिट्यूट, जैन होस्टेल, पु. ल. देशपांडे उद्यान, एस. पी. कॉलेज या सर्वच जागांना आवर्जून स्थान देण्यात आल्याने पुणेकरांनीही या चित्रपटाला डोक्यावर घेतले. या चित्रपटानंतर इथे कित्येक चित्रपटांचे शूटिंग्ज होऊ लागले. अगदी सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटाचे शूटिंग जपानी वास्तुरचनेवर तयार केलेल्या गार्डनमध्ये झाले होते. त्या पाठोपाठ ‘मंगलाष्टक वन्स मोअर, लोकमान्य टिळक या चित्रपटांचीही भर पडली. मुंबई-पुणे-मुंबई या पहिल्या भागात तर संपूर्ण शूटिंग पुण्यातच झाले आहे. तुळशीबाग, चितळेबंधू मिठाईवाले, झेड ब्रिज, फर्ग्युसन रस्ता, सिंहगड, अहो अगदी पुणे स्टेशनही. हां... त्याच्या दुसऱ्या भागात मुंबईतील काही भाग दाखवले गेले, पण ती कथेची गरज होती, असं म्हटलं पाहिजे. कारण पहिला भाग म्हटलं असतं तर मुंबईवर चित्रपट करू शकता आला असता ना, पण नाही... म्हटलं ना... पुण्याचे स्थान. आता राजवाडे अँड सन्सही नाही म्हटलं, तरी पुण्याच्या कल्चरवर भाष्य करतोच की... भारतातील फास्टेस्ट ग्रोइंग सिटी म्हणजे पुण्यातील कोथरूडच्या भागावर आणि पुण्याच्या संस्कृतीवरच तर बोलतो. रमा माधव आणि आता येऊ घातलेला बाजीराव मस्तानी काय पुण्याचाच इतिहास आहे म्हणा. मग तो पुण्याचाच असणार... यातच आता मराठी चित्रपटांना उत्तम प्रतिसाद देणारी शहरं कोणती, तर ‘पुणे-मुंबई’ असंच म्हटलं जाते... त्यामुळेच या दोन शहरांना केंद्रस्थानी ठेवून चित्रपटांची निर्मिती होत आहे... यातच पुण्यात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट असल्याने निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार घडविण्याची प्रक्रिया पुण्यातच घडत आहे... मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सोनेरी पान असलेली ‘प्रभात’ची वास्तूदेखील पुण्यातच आहे... त्यामुळेच मराठीसह बॉलीवूड चित्रपटसृष्टीच्या यादीत ‘पुणे’ महत्त्वाचे ‘हब’ बनले आहे... मुंबईपाठोपाठ पुण्याचीही चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण झाली आहे... आगामी काही वर्षांत हॉलीवूडच्या निर्मात्यांनाही पुण्याची भुरळ पडेल, अशी आशा करायला नक्कीच हरकत नाही!
मुंबई हे तंत्रज्ञानासाठी उत्तम शहर नक्कीच आहे, पण त्यापेक्षाही चित्रपटासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात, त्या पुण्यात लवकर आणि सहजरीत्या उपलब्ध होतात. पुण्यातील हवामान चित्रपटाच्या शूटिंग्जसाठी योग्य आहेच, पण त्याशिवाय आउटडोअर लोकेशन्ससाठी लागणारी परवानगी पुण्यात लवकर मिळते. त्याबरोबरच मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर असल्याने तिथे मराठमोळं वातावरण पाहायला मिळत नाही, जे पुण्यात उपजतच आहे.
- सतीश राजवाडे, दिग्दर्शक
------
- namrata.phadnis@lokmat.com