"खूप लोकांना वाटतं की मी मुसलमान झालो...",'श्वास' फेम अभिनेता अश्विन चितळेचं वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:09 IST2025-02-07T13:08:40+5:302025-02-07T13:09:11+5:30
२००४ साली रिलीज झालेला चित्रपट श्वासमधून बालकलाकार अश्विन चितळे (Ashwin Chitale) घराघरात पोहचला. आता तो खूप मोठा झाला असून सिनेइंडस्ट्रीपासून दुरावला आहे.

"खूप लोकांना वाटतं की मी मुसलमान झालो...",'श्वास' फेम अभिनेता अश्विन चितळेचं वक्तव्य चर्चेत
२००४ साली रिलीज झालेला चित्रपट श्वासमधून बालकलाकार अश्विन चितळे (Ashwin Chitale) घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने बालकलाकार म्हणून आहिस्ता आहिस्ता , जोर लगाके हैय्या , टॅक्सी नं ९२११,देवराई या हिंदी-मराठी सिनेमात काम केले. आता तो खूप मोठा झाला असून सिनेइंडस्ट्रीपासून दुरावला आहे. अश्विनला दिग्गज सूफी कवी रूमीच्या कवितांनी वेड लावले. यानंतर त्याने रूमीच्या पौराणिक कथा, त्याचे साहित्य संकलित करून त्याने त्याचे भाषांतर केले. रूमीवरच्या अनेक कार्यक्रमाचे नियोजन, कथाकथनही तो सादर करतो. दरम्यान आता त्याने एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे.
अश्विन चितळे याने नुकतेच मुक्काम पोस्ट मनोरंजन या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याला विचारण्यात आले की, सध्या त्याच्या आजूबाजूला काय घडणारे अस्वस्थ करते आणि त्याच्यामुळे काय बदल व्हावेत असे वाटते. त्यावर तो म्हणाला की,
बाहेरच्यामध्ये बदल करावा असे निश्चितच वाटतो. अस्वस्थपणा असा फार काही होत नाही. बदल व्हावेत अशा खूप गोष्टी आहेत. पण मुळात लोकांनी समज बदलला पाहिजे. कारण समज खूप बनवले गेले. अशी खूप लोक पाहिली आहेत. बऱ्याच लोकांना मी मुसलमान झालो आहे, असे वाटते. त्या लोकांना मला दोन प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न कशामुळे आणि दुसरा प्रश्न मुसलमान झालो तर काय. तुम्ही मला अश्विन चितळे म्हणून ओळखता. मी तुम्हाला बदलायला सांगत नाही. मी माझा माझा बदलतोय. ही काय भीती आहे, हे मला समजत नाही.
''तर तुम्हाला का फरक पडतो?''
अश्विन पुढे म्हणाला की, मी तुम्हाला माणूस म्हणून माहित आहे ना. एखादा व्यक्ती माणूस म्हणून कसा आहे हे माहिती आहे तर उद्या मी माझं काहीही नाव लावले आणि कोणतेही कपडे घातले तर तुम्हाला का फरक पडतो. कारण मला फरक पडत नाही तुम्ही कोणीही असाल, तुमची काहीही मते कशीही असतील. जोपर्यंत तुम्ही मला करायला सांगत नाही, तोपर्यंत मला काहीच फरक पडत नाही. तर इथंपासून मला लोकांनी बदलावी अशी इच्छा आहे. पण ती इच्छा मर्यादेपेक्षा जास्त झाली की ती अस्वस्थतापणा येऊ लागतो.