लग्नच ठरला टर्निंग पॉइंट
By Admin | Updated: May 6, 2016 01:49 IST2016-05-06T01:49:11+5:302016-05-06T01:49:11+5:30
हीरोईइनचे लग्न झाले की करियर थांबते असे लोक म्हणतात. पण माझ्या बाबतीत म्हणाल तर लग्नच करियर पॉइंट ठरले. लग्नानंतर मुलीचा पायगुण चांगला असेल, तर नवऱ्यामुलाला यश

लग्नच ठरला टर्निंग पॉइंट
हीरोईइनचे लग्न झाले की करियर थांबते असे लोक म्हणतात. पण माझ्या बाबतीत म्हणाल तर लग्नच करियर पॉइंट ठरले. लग्नानंतर मुलीचा पायगुण चांगला असेल, तर नवऱ्यामुलाला यश मिळते; पण माझ्याबाबत हे नेमकं उलट ठरलं आहे. म्हणून माझ्यासारखं लग्न कोणाला मानवलं नाही. लग्नानंतर विलक्षण कामाचे योग आले. अमिताभ बच्चन, रणवीर यांची प्रवासातील भेट नेहमीच मार्गदर्शक राहील. तसेच आता अनिल कपूर यांच्या ‘२४’मध्ये काम करतेय... अमृता खानविलकर बोलता-बोलताच नॉस्टॅल्जिक झाली आणि तिने आपल्या करियरचा प्रवास उलगडला.. पुण्यामध्ये ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने आयोजित ‘खेळ मांडियेला’ कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झालेल्या अमृताने अनेक आठवणी ‘लोकमत सीएनएक्स’सोबत शेअर केल्या. तिच्या सोनेरी प्रवासातील अनेक प्रसंग सांगत आजपर्यंत साथ दिलेल्या सर्वांचे आभार मानले. आपला हा प्रवास कोणाला तरी काही यशाच्या शिखरावर जाण्यासाठी प्रोत्साहन देईल आणि ताकद बनेल, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली.
वाजले की बारा
डान्स परफॉर्मन्स कुठेही असो, वाजले की बारा हे गाणे लागले, की मी या गाण्यावर एकदा नाही तर दोनदा नाचते. तसेच, माझी जी सिग्नेचर स्टेप आहे त्यावर मी फुल जल्लोष करते. त्या वेळचा जो प्रेक्षकांचा रिस्पॉन्स असतो ना, तो खरंच सुंदर असतो. महाराष्ट्रातून मिळालेली ही दाद ना मला लय भारी वाटते.
लेडी रणवीर सिंग
रणवीर सिंग म्हणजे ऊर्जेचा अखंड झरा. ‘कम्प्लिट हाय एनर्जी पॅकेज’. तो नेहमीच म्हणतो, हे करू या-ते करू या. तो म्हणजे एक तुफान आहे. मी अगदी त्याच्यासारखीच आहे. मला सतत काही ना काही करायचे असते. म्हणूनच माझी मैत्रीण क्रांती रेडकर मला नेहमीच लेडी रणवीर सिंग म्हणते.
अमृता ‘२४’मध्ये
मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की, या मालिकेत मला काम करण्यास मिळाले. या मालिकेत माझी भूमिका महाराष्ट्रीय राजकीय नेत्याच्या यंग पत्नीची आहे. तसेच या २४ मालिकेत प्रत्येक गोष्ट गुंफलेली असते. माझा ट्रॅकही कसा गुंफला गेला ते या सीझनमध्ये पाहायला मिळेल. तसेच रमेश देव प्रॉडक्शनसोबत काम करताना खूप मज्जा आली. रेंजील व अभिनय सर यांच्याकडूनदेखील खूपकाही शिकायला मिळाले.
तू आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहेस. पण त्याची सुरुवात कशी झाली? पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर जाण्याचा अनुभव कसा होता?
पहिल्यांदा मी अतुल शिधये यांच्या कॅमेऱ्यासमोर गेले. अगदी नवखी होते. आपण कसे दिसतो, फीचर्स कसे आहे? अगदी काही कल्पना नव्हती. पण, अतुल यांनी माझे अत्यंत सुंदर फोटो काढले. परिचितांना हे फोटो दाखविले. त्यातूनच मला काम मिळत गेले. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी मला खूप मदत केली.
नच बलिए, एकापेक्षा एक या सुपहरहिट शोमधून तुझ्यातील डान्सर खऱ्या अर्थाने पुढे आली. त्याबाबतच्या काही आठवणी?
नच बलिये या शोमध्ये रणबीर कपूर, फराह खान, रेमो फर्नांडिस आले होते. माझ्या आणि हिमांशुच्या डान्सचे कौतुक झालेच पण चांगले गुणही मिळाले. परीक्षक आणि प्रेक्षकांच्या नजरेत जागा मिळविणे, हेच माझ्यासाठी खूप आनंदाचे क्षण होते. ‘आजपर्यंतचा उत्कृष्ट परफॉर्मन्स’ अशी रणबीरची कॉमेंट तर माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली. रेमो फर्नांडिसनी माझ्या एक्सप्रेशनचे कौतुक केले. फराह खान म्हणाल्या, ‘तुझ्यासारखी डान्सर मी पाहिलेली नाही.’ तो सगळा काळच भारावलेला होता. ही सगळीच मंडळी माझ्यासाठी नेहमीच स्पेशल ठरली आहे. जिंकणं हा एक अत्यंत छोटा क्षण असतो. परंतु, तिथपर्यंत पोहोचण्याचे हे जे क्षण आहेत ना, ते खूप महत्त्वाचे असतात. हे दोन्ही कार्यक्रम माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले.
तुझ्या आयुष्यातील काही अविस्मरणीय क्षण?
‘नटरंग’मधील ‘वाजले की बारा’ गाण्याने मला डान्सर म्हणून वेगळी ओळख मिळवून दिली. ‘नच बलिए’ माझ्या करियरचा महत्त्वाचा टप्पा आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटासाठी मिळालेला पुरस्कार तर खूपच महत्त्वाचा आहे. मला नेहमीच असे वाटायचे, की एक पुरस्कार मिळावा आणि तो मी माझ्या आईला अर्पण करावा. या चित्रपटाच्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण झाली.
आज तू अनेकांची आयडल बनली आहेस. पण तुझे आयडल कोण आहेत?
ग्लोबल फिगर म्हणाल, तर प्रियांका चोप्रा. पण, माधुरी दीक्षित नेहमीच डान्सबाबतीत माझी आयडल राहिली आहे. अभिनयासाठी काजल. जिद्द म्हणजे काय असते आणि एखादी मुलगी काय करून दाखवू शकते, याचे उदाहरण प्रियांका चोप्राने घालून दिले आहे. त्यामुळे ती नेहमीच माझ्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व राहील.
यशस्वी वाटचालीत ‘सीएनएक्स’च्या माध्यमातून तुला कोणाला ‘थॅँक्स’ म्हणायल आवडेल?
आईने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. पण आमचे नातेच असे आहे की रोज झोपेतून उठून मी तिला थँक्स नाही म्हणू शकत. माझी मित्रमंडळी तसेच पुण्यात मी श्रीगोपाल विहारमध्ये कॉलनीमध्ये राहत असताना, गणपतीच्या काळात पहिल्यांदा सतरंजीवर डान्स केला. माधुरी दीक्षितच्या ‘आँखियां मिलाऊं कभी आँखियां चुराऊं’ या गाण्यावर मी डान्स केला होता. संपूर्ण कॉलनीतील लोक मला ‘एमडी’ म्हणायचे. त्यांनी दिलेल्या हुरूप व प्रोत्साहनामुळेच मी येथे पोहोचले आहे. कॉलेजमध्ये गायकवाड मॅडमनेही मला खूप मदत केली. माझ्यातील नृत्यकलेला प्रोत्साहन दिले.
या सर्वांना मी मनापासून थँक्स म्हणू इच्छिते!
- benzeerjamadar@lokmat.com