"मन सुन्न झालं, डोळ्यात पाणी...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अनुमप खेर यांनी व्यक्त केलं दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:14 IST2025-06-13T16:10:23+5:302025-06-13T16:14:45+5:30
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अनुमप खेर काय म्हणाले? व्हिडीओने वेधलं लक्ष

"मन सुन्न झालं, डोळ्यात पाणी...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अनुमप खेर यांनी व्यक्त केलं दु:ख
Anupam Kher Emotional on Ahmedabad Plane Crash :अहमदाबादमध्ये (Ahmedabad Plane Crash) झालेल्या विमान अपघातामुळे संपूर्ण जगाला हादरा बसला आहे. ही बातमी कानावर येताच अनेकांना धक्का बसला आहे. अहमदाबादहून लंडनच्या दिशेने झेपावणारं एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान उड्डाण केल्यानंतर क्षणार्धात २६५ जणांना घेऊन कोसळले. या अपघातानंतर मनोरंजन जगतातील कलाकार शोक व्यक्त करत आहे. दरम्यान, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर(Anupam Kher) यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
अहमदाबादच्या मेगाणीनगर भागात झालेल्या विमान अपघातानंतरचे दृश्य पाहून अनेकांचा थरकाप उडाला. अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर या अपघातावर शोक व्यक्त करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, "अहमदाबादमधील विमान अपघात ही केवळ बातमी नाही तर हा दु:खाचा डोंगर आहे जो अनेकांवर कोसळला आहे. ते विमान फक्त एक यंत्र नव्हते, त्याच्याशी भावना जोडल्या होत्या, ज्यामध्ये आपले खास, जवळचे बसले होते. काही भारतातून आले होते, काही परदेशातून आले होते. त्यातील काही जणांच्या आई होत्या, तर काही जण त्यांच्या मुलाकडे परतत होते. याशिवाय काही जण कामासाठी प्रवास करत होते. काही जण सुट्टीनंतर घरी परत येत होते. पण कोणालाही माहित नव्हतं की हा प्रवास त्यांचा शेवटचा प्रवास ठरेल."
त्यानंतर पुढे अभिनेते म्हणाले, "मन सुन्न झालं आहे, हृदय शांत आहे, डोळे पाणावले आहेत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांसोबत आमच्या संवेदना आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी आणि जखमी झालेल्यांना धीर, धैर्य आणि आधार मिळावा अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. आज भाषा किंवा तर्क काम करत नाहीये. मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत. संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. ओम शांती, श्रद्धांजली...!" असं ते म्हणाले आहेत.