काही मिनिटात होत्याचं नव्हतं झालं, टेकऑफनंतर विमान कोसळलं आणि गमावली होती अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:30 IST2025-06-12T17:26:00+5:302025-06-12T17:30:56+5:30
टेकऑफनंतर काही मिनिटांमध्येच विमान कोसळलं आणि सौंदर्यवती अभिनेत्रीचा दुर्दैवी अंत, मृतदेहाची ओळखही पटवता आली नव्हती!

काही मिनिटात होत्याचं नव्हतं झालं, टेकऑफनंतर विमान कोसळलं आणि गमावली होती अभिनेत्री
Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात झाला आहे. अहमदाबाद एअरपोर्टवरुन लंडनच्या दिशेने झेपावलेल्या एअर इंडियाचे विमानाचा भीषण अपघात झाला आहे. एअरपोर्टवरुन उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच विमान कोसळले आणि मोठा स्फोट झाला. या विमानात एकूण १२ क्रू मेबर्स, असे एकूण २४२ लोक होते. या दुर्घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अशाप्रकारे विमान क्रॅश होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. २१ वर्षांपूर्वी अशाच एका विमान अपघातात एक अभिनेत्री मृत्युमुखी पडली होती.
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचे नाव आहे सौंदर्या. अभिनेत्रीला सूर्यवंशम या चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात तिने राधा ठाकूरची भूमिका केली होती. हा सौंदर्याचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट होता. सौंदर्याने तमिळ, तेलगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये काम केले होते. अभिनय क्षेत्रात नाव कमावल्यानंतर तिनं राजकारणात प्रवेश केला होता. ती भाजप आणि तेलगू देसम पक्षात सामील झाली. राजकारणात नवा टप्पा गाठण्यासाठी तयार असलेल्या सौंदर्याच्या नशिबात पण नियतीने काहीतरी वेगळच लिहून ठेवलं होतं.
१७ एप्रिल २००४ रोजी सौंदर्या (Soundarya Died In A Plane Crash) ही कर्नाटकातील जक्कूर एअरबेस येथून भाजपच्या प्रचारासाठी आंध्र प्रदेशातील करीमनगरला निघाली होती. पण, टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमान कोसळले. त्या विमान अपघातामध्ये एकही प्रवासी वाचला नव्हता. वृत्तानुसार, सौंदर्या त्यावेळी गर्भवती होती. तिच्या मृतदेहाचीही ओळख पटवता आली नव्हती. एवढा भीषण अपघात झाला होता. पण, काही दिवसांपुर्वीच असा आरोप करण्यात आला की, तिचा मृत्यू अपघाती नव्हता तर तेलुगू अभिनेता मोहन बाबू यांच्याशी मालमत्तेच्या वादामुळे खून झाला होता. याबाबत चिट्टीमल्लू नावाच्या व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. मोहन बाबू यांनी तिच्यावर जमीन विकण्यासाठी दबाव आणला होता. तर विमान अपघातानंतर त्यांनी बेकायदेशीरपणे त्या जमीनीवर कब्जा केल्याचा आरोप तक्रारदाराने केला.