...तर मी अभिनय सोडून देईन; 'सितारे जमीन पर'बाबत बोलताना आमिर खान नेमकं काय म्हणाला?
By कोमल खांबे | Updated: June 7, 2025 15:52 IST2025-06-07T15:52:02+5:302025-06-07T15:52:39+5:30
"असा एकही क्षण आला नाही जेव्हा वाटलं...", आमिर खानने सांगितला 'सितारे जमीन पर'मध्ये दिव्यांग मुलांसोबत काम करण्याचा अनुभव

...तर मी अभिनय सोडून देईन; 'सितारे जमीन पर'बाबत बोलताना आमिर खान नेमकं काय म्हणाला?
>> कोमल खांबे
'सितारे जमीन पर' या आमिर खानच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. या सिनेमात आमिर दिव्यांग मुलांच्या बास्केटबॉल कोचची भूमिका साकारताना दिसणार आहे. तारे जमीन पर या सिनेमाचा हा सीक्वल असणार आहे. 'सितारे जमीन पर' सिनेमा येत्या २० जूनला प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने आमिरने पत्रकारांशी खास संवाद साधत दिव्यांग मुलांसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.
'सितारे जमीन पर' सिनेमा प्रदर्शित होत आहे. काय भावना आहेत?
मूल जन्माला येताना एखाद्या आईच्या ज्या भावना असतात, तशाच काहीशा भावना सिनेमा रिलीज होण्याआधी माझ्या मनातही आहेत. एक वडील म्हणून माझ्या मुलांसाठी ज्या भावना असतात, तशाच भावना मला माझ्या सिनेमाबद्दल असतात. कारण, माझ्यासाठी सिनेमा म्हणजे माझे बाळच आहे. प्रत्येक आईवडिलांना वाटत असते की आपले मूल सगळ्यांचे लाडके व्हावे, त्याला सगळ्यांनी पसंत करावे. सिनेमाच्या बाबतीतही तसेच असते. त्यामुळे उत्साह तर आहेच पण त्यासोबतच मी थोडा निराशही आहे.
सिनेमातील इतर पात्रांचे सिलेक्शन कसे झाले?
सुरुवातीला सगळ्यांना त्या मुलांना पाहून असेच वाटले की हेदेखील कलाकार आहेत. पण, हे अॅक्टर्स नाहीत. कास्टिंग प्रोसेसमधूनच या सगळ्यांचेही सिलेक्शन झालेले आहे. संपूर्ण सिनेमाच्या शूटिंगमध्ये असा एकही क्षण आला नाही जिथे वाटले की या मुलांकडून हे होणार नाही. जेवढा वेळ नॉर्मल कलाकारांसोबत शूटिंग करायला लागतो, तेवढ्याच वेळात किंबहुना त्यापेक्षा कमी वेळात त्यांनी शूटिंग केले. यामागे त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे.
'तारे जमीन पर' सिनेमापेक्षा हा सिनेमा किती वेगळा आहे?
'सितारे जमीन पर' सिनेमातून खूप भावनिक विषय हाताळला गेला आहे. 'तारे जमीन पर' सिनेमात एक शिक्षक ईशानला त्याच्या प्रवासात मदत करतो. या सिनेमात उलट आहे. यामध्ये १० दिव्यांग मुले शिक्षकाला मदत करतात. 'तारे जमीन पर' चित्रपटात त्या मुलाची जर्नी होती. या सिनेमात त्या शिक्षकाचा प्रवास पाहायला मिळणार आहे. ही त्या १० दिव्यांग मुलांची गोष्ट आहे.
सिनेमातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
मी माझी भूमिका खूप एन्जॉय केली. मी खऱ्या आयुष्यात कुणाला उलट बोलत नाही. पण सिनेमातील भूमिका अशी आहे की मी सगळ्यांना उलट बोलतो. या सिनेमातील माझे पात्र खूप उद्धट आहे, त्यामुळे खऱ्या आयुष्यात जे मी करत नाही ते मला सिनेमात करायला मिळालं.
'सितारे जमीन पर' दिग्दर्शित करण्याचा विचार आला नाही का?
'तारे जमीन पर' मी दिग्दर्शित केला कारण तेव्हा परिस्थिती तशी होती. पण, अजून तरी मी अभिनेता आहे. जेव्हा मी दिग्दर्शनात पाऊल ठेवेन, त्यानंतर मी अभिनय करेन, असे मला वाटत नाही. त्यामुळे मी सध्या तरी त्याचा विचार करत नाहीये. दिग्दर्शक म्हणून अजून मी करिअरला सुरुवात केलेली नाही. पण, जेव्हा मी सिनेमा दिग्दर्शित करायचे ठरवेन तेव्हा मी ते करिअर म्हणून करेन. त्यानंतर मी अभिनय करणार नाही.
बॉलिवूडमध्ये लहान मुलांवर सिनेमे का बनत नाहीत?
हिंदी सिनेइंडस्ट्रीमध्ये मुलांवर फार कमी सिनेमे बनतात, ही वाईट गोष्ट आहे. मला वाटते की इंटस्ट्रीमध्ये असा समज आहे की मुलांवरच्या सिनेमांना मार्केट नाही. पण, मुले आहेत तर मार्केटही असणार. ते जर डिस्ने बघतात तर मग मार्केटही आहे. पण, आपल्याला त्या मार्केटसाठी सिनेमे बनवता येत नाहीत. भारतातील मुलांसाठी आपण भारतीय कंटेट बनवला पाहिजे. आपली मुले सध्या हिंदी भाषेत डबिंग केलेला परदेशी कंटेट बघतात. पण, हे चुकीचं आहे.
सिनेमाची स्क्रिप्ट निवडताना कोणती गोष्ट महत्त्वाची वाटते?
मी खूप सोशल सिनेमे केले आहेत. पण, कदाचित तो माझा स्वभाव असल्याने मी सोशल सिनेमांकडे जास्त आकर्षित होत असेन. पण, जेव्हा स्क्रिप्ट येते तेव्हा ती आधी मी एक प्रेक्षक म्हणून ऐकतो किंवा वाचतो. जर एक प्रेक्षक म्हणून स्क्रिप्ट आवडली तरच मी होकार देतो. प्रेक्षकांना सोशल मेसेजसोबतच मनोरंजनही हवे असते. एक कलाकार म्हणून लोकांचे मनोरंजन करणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. त्यामुळे सोशल मेसेज देताना कथा क्रिएटिव्हपणे लिहिली आहे की नाही तेदेखील मी बघतो. '३ इडियट्स', 'दंगल', 'रंग दे बसंती', 'लापता लेडिज' हे सिनेमे सोशल मेसेज देतात पण ते मनोरंजनही करतात.