तिप्पट पगारवाढ घेत अजित आगरकरने निवड समितीची सूत्रं हाती घेतली; खेळांडूपेक्षा जास्त मानधन

भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या ( Ajit Agarkar ) नावाचे शिक्कामोर्तब झाले. बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले होते आणि आगरकर हा अर्ज दाखल करणारा एकमेव उमेदवार होता. क्रिकेट सल्लागार समितीने ( CAC) त्याची मुलाखत घेतली अन् त्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

सुलक्षण नाईक, अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे यांच्या समितीने आगरकरची निवड केली. निवड समिती प्रमुखाला दिला जाणारा पगार हा कळीचा मुद्दा होता आणि त्यामुळे माजी खेळाडू या पदासाठी अर्ज दाखल करण्यास इच्छुक नव्हते. पण, BCCI ने अखेर तिप्पट पगारवाढ देण्याचे आगरकरला कबुल केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आगरकर समालोचक व आयपीएल संघाला प्रशिक्षण देताना दिसला. दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफचा तो सदस्य होता आणि त्यामुळेच तो आतापर्यंत निवड समितीसाठी अर्ज करू शकत नव्हता. पण, DC ने त्याला या पदावरून मुक्त केले आणि त्याने अर्ज दाखल केला.

आधी निवड समिती प्रमुखाला वर्षाला १ कोटी पगार दिला जायचा, परंतु आता तो तिप्पटीने वाढला आहे. बीसीसीआयने १ कोटींहून ३ कोटी पगार देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचा पहिला लाभार्थी आगरकर ठरला आहे. निवड समितीमधील अन्य सदस्यांना वर्षाला ९० लाख पगार मिळायचा, परंतु आता त्यातही वाढ होण्याची चर्चा आहे.

नवीन निवड समिती प्रमुखाने बुधवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. शिव सुंदर दास, सुब्रोतो बॅनर्जी, श्रीधरण शरथ व सलिल अंकोला अशी समिती आहे. ही समिती आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० संघाची घोषणा करणार आहे.

गोलंदाज म्हणून लॉर्ड्सवर शतक झळकावण्याचा पराक्रम अजित आगरकने केला होता. त्याने भारताकडन २६ कसोटी, १९१ वन डे व ४ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. त्याच्याकडे ११० प्रथम श्रेणी, २७० लिस्ट ए आणि ६२ ट्वेंटी-२० सामन्यांचाही अनुभव आहे.

२००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा ( २१ चेंडू वि. झिम्बाब्वे, २०००) विक्रम आहे. शिवाय त्याने २३ सामन्यांत ५० विकेट्स घेतल्या आणि वन डेत सर्वात जलद ५० विकेट्सचा विक्रमही त्याने नोंदवला.