Jasprit Bumrah Team India: "जुन्या बुमराहला आता विसरून जा, त्याची काय गॅरंटी? तो परत आला तरीपण..."; वर्ल्ड चॅम्पियन भारतीय दिग्गजाचं रोखठोक मत

WTC Final साठी बुमराहच्या जागी सुचवलं 'या' खेळाडूचं नाव

Jasprit Bumrah Team India: भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. यावर उपचार घेण्यासाठी तो न्यूझीलंडला गेला आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की बुमराहची शस्त्रक्रिया न्यूझीलंडमध्ये होणार आहे. या दुखापतीमुळे बुमराह IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कडून खेळणार नसून, ICC World Test Championship Final मधून बाहेर पडला आहे.

जसप्रीत बुमराहला बरे होण्यासाठी सुमारे सहा महिने लागतील. अलीकडेच, बुमराहच्या दुखापतीने त्याला खूप त्रास दिला आहे आणि अशा परिस्थितीत त्याच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताचा माजी वेगवान गोलंदाज मदन लाल यांनीही बुमराहबद्दल एक धक्कादायक विधान केले आहे.

बुमराहने तंदुरुस्त व्हावे आणि देशासाठी खेळावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे, परंतु मदन लाल यांनी आता 'बुमराहला विसरून जा' असे स्पष्ट मत मांडले आहे. तसेच त्याच्या ऐवजी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी संघात एका गोलंदाजांचेही नाव समाविष्ट करण्यास सुचवले आहे.

मदन लाल म्हणाले, "आता तुम्हाला जुन्या बुमराहसारखा गोलंदाज मिळेल ही आशा सोडा. एक दुखापत बरी होण्यासाठी जास्तीत जास्त तीन महिने लागतात. सप्टेंबरपासून तो क्रिकेट खेळलेला नाही. हार्दिक पांड्याही पाठीच्या दुखापतीमुळे चार महिन्यांनंतर परतला होता. बुमराह सहा महिन्यांपासून क्रिकेट खेळलेला नाही."

बुमराहची गॅरंटी कोण देणार? तो परत कधी येईल, काहीच माहीत नाही. त्याला दीड वर्षही लागू शकतात. कारण तो बराच काळ खेळलेला नाही. याचाच अर्थ दुखापत खूप गंभीर आहे. त्यामुळे त्याच्याकडून जुना बुमराह परत मिळे अशी अपेक्षा कशी करता येईल? त्याला सावरायला वेळ लागेल. जर तुम्हाला जुन्या बुमराहला पाहायचे असेल तर तुम्हाला त्याला वेळ द्यावाच लागेल," असे अतिशय रोखठोक विधान मदन लाल यांनी केले.

“भारतीय संघ उमेशचा डब्ल्यूटीसी फायनलसाठी विचार करू शकतो. तिथे तुम्हाला तीन वेगवान गोलंदाज लागतील. त्यामुळे एक स्पिनर खेळू शकतो आणि बाकीचे वेगवान गोलंदाज असतील. आता बुमराहला विसरून जा. त्याचा विचार करणं सोडून द्या. तो जेव्हा परत संघात येईल तेव्हा त्याच्याबद्दल बघू. आतातरी तुमच्याकडे जे आहे ते वापरा," असे मदन लाल यांनी सुचवले.