कोई नहीं था टक्‍कर में...! आजच्याच दिवशी भारताने जिंकली होती शेवटची ICC ट्रॉफी

icc champions trophy 2013 final : आज म्हणजेच २३ जून हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अविस्मरनीय दिवस आहे.

आज म्हणजेच २३ जून हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अविस्मरनीय दिवस आहे. आजच्याच दिवशी दहा वर्षापूर्वी भारताने शेवटची ICC ट्रॉफी जिंकली होती. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही किमया साधली होती.

खरं तर २०१३ नंतर आजतागायत भारताच्या खात्यात आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ आहे. धोनीनंतर कोणत्याच भारतीय कर्णधाराला आयसीसीचा किताब पटकावता आला नाही. १० वर्षापूर्वी २०१३ मध्ये आजच्या दिवशी टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

२३ जूनच्या दिवशी भारतीय संघ चॅम्पियन्स झाला आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. धोनीचा हा विक्रम आजतागायत कोणताच खेळाडू मोडू शकला नाही.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकताच धोनी आयसीसीचे तीन वेगवेगळे किताब जिंकणारा जगातील पहिला कर्णधार बनला होता. २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या आधी धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ चा ट्वेंटी-२० विश्वचषक आणि २०११ मध्ये वन डे विश्वचषक जिंकला होता.

दरम्यान, २०१३ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पावसाच्या व्यत्ययामुळे २०-२० षटकांचा खेळवण्यात आला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १२९ धावा केल्या होत्या.

इंग्लंडच्या फलंदाजीसमोर हे लक्ष्य लहान वाटत होते. पण १३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची खराब सुरूवात झाली. पहिल्या ९ षटकांत इंग्लंडने ४६ धावांवर आघाडीचे ४ फलंदाज गमावले होते.

ॲलिस्टर कुक (२), इऑन बेल (१३), जोनाथन ट्रॉट (२०) आणि जो रूट (७) धावा करून बाद झाला होता. ४ गडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर इयोन मॉर्गन आणि रवी बोपारा यांनी इंग्लिश संघाचा डाव सांभाळला.

१८व्या षटकात ११० धावा करून इंग्लंडचा संघ चॅम्पियन होण्याचे दिशेने कूच करत होता. पण, इशांत शर्माने मॉर्गन (३३) आणि बोपारा (३०) दोघांनाही एकाच षटकात बाद केले आणि सामना भारताच्या दिशेने झुकला.

अखेर इंग्लंडचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १२४ धावा करू शकला. अखेरच्या चेंडूवर इंग्लंडला सहा धावांची आवश्यकता असताना रविचंद्रन अश्विनने निर्धाव चेंडू टाकला अन् भारताने पाच धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ मध्ये भारतीय सलामीवीर शिखर धवन शानदार फॉर्ममध्ये होता. त्याने ५ डावात दोन शतके झळकावून ९०.७५ च्या सरासरीने ३६३ धावा केल्या होत्या. धावांच्या बाबतीत या स्पर्धेत गब्बरच्या कोण जवळपास देखील नव्हते.