टीम इंडियाचा सुपर-८च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ७६ धावांनी पराभव केला. या पराभवाने नेट रन रेटवर परिणाम झाला असून भारताचे सेमीफायनलचे गणित बिघडले. या लाजिरवाण्या पराभवामागील कारणे समजून घेऊया.
सामन्यात दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही खराब झाली. आफ्रिकेचे तीन आघाडीचे फलंदाज २० धावांवर बाद झाले. पण भारतीय गोलंदाजांनी हा दबाव कायम ठेवला नाही. मिलर आणि ब्रेव्हिस यांनी आक्रमक फलंदाजी करत ९७ धावा जोडल्या.
सामन्यात वरुण चक्रवर्तीने ४ षटकांत ४७ धावा तर सुंदरने २ षटकांत १७ धावा दिल्या. फिरकीपटूंनी एकच बळी घेतला. तसेच हार्दिकने शेवटच्या षटकात २० धावा दिल्या. त्यामुळे लक्ष्य १८८ पर्यंत वाढले आणि मानसिक दबाव निर्माण झाला.
भारतीय सलामीवीरांनी पुन्हा एकदा निराशा केली. पहिल्या षटकात ईशान शून्यावर बाद झाला. पाठोपाठ तिलक वर्माही स्वस्तात बाद झाला. अभिषेककडून मोठी खेळी खेळण्याची अपेक्षा होती, पण तोही १५ धावा काढल्यानंतर माघारी परतला.
प्रत्येक फलंदाज पहिल्याच चेंडूपासून षटकार मारण्याच्या प्रयत्नात होता. खेळपट्टी समजून घेण्याची तसदी कुणीच घेतली नाही. विकेट सांभाळून भागीदारी करायला हवी होती, पण तसा विचार कुणीच न केल्याने टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली.
अक्षरच्या जागी संघात सुंदरला संधी दिली, पण तो फलंदाजी आणि गोलंदाजीत अपयशी ठरला. दुसरीकडे अक्षर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्हीमध्ये प्रभावी आहे. त्यामुळे सुंदरला संघात घेण्याचा प्रयोग पूर्णपणे फसल्याचे दिसून आले.