भारतीय संघाला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पराभूत व्हावे लागले. १२४ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना, भारतीय संघ केवळ ९३ धावाच करू शकला आणि ३० धावांनी पराभूत झाला.
कोलकाता येथील घरच्या मैदानावर भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाल्यामुळे फलंदाजांवर टीकेची झोड उठली. तसेच पिच निवडवरूनही टीका झाली. माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारानेही यावर रोखठोक मत मांडले.
चेतेश्वर पुजारा म्हणाला, 'भारतीय संघ घरच्या पीचवर खेळतोय. संघातील प्रत्येक खेळाडू टॅलेंटेड आहे. प्रत्येकाचे देशांतर्गत क्रिकेटमधील रेकॉर्ड खूप चांगले आहे. असे असूनही आपण भारतीय पिचवरच हरतोय, तर मग काहीतरी गडबड नक्कीच आहे.'
'जर तुम्ही या संघासोबत एखाद्या चांगल्या पीचवर सामना खेळला असतात, तर विजयाची जास्त संधी मिळाली असती. अशा वेळी तुम्ही कसोटी क्रिकेटला नक्की कसे पाहता यावरच प्रश्नचिन्ह आहे'
'अशा पद्धतीच्या पिचवर खेळताना विजयाची शक्यता अजून कमी होते. विरोधी संघ तुमच्या बरोबरीला येऊन उभा ठाकतो. त्यापेक्षा तुम्ही चांगल्या पीचवर हा सामना खेळवा. त्याने भारतीय संघाला नक्कीच फायदा होईल.'
आफ्रिकेविरुद्ध भारताचा अ संघ देखील जिंकू शकतो, पण पीचची निवड नीट करता यायला हवी. भारतीय संघ बदलातून जात आहे. ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये हरला तर समजू शकतो. पण घरच्या पिचवर हा हे मला सहनच होत नाही.'