IND vs PAK, T20 World Cup 2026: BCCIचा 'मास्टरप्लॅन'! भारताने गुपचूप केला पाकिस्तानचा 'गेम'

IND vs PAK, T20 World Cup 2026: पाकिस्तानचा बहिष्काराचा इशारा, टीम इंडिया करणार 'वॉकओव्हर'

पाकिस्तान सरकारने १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानकडे आशिया चषकाचे यजमानपद होते, तेव्हा भारताचे सर्व सामने पाकिस्तानबाहेर दुबईत खेळवण्यात आले होते.

त्याच न्यायाने भारताकडे यजमानपद असलेल्या टी२० विश्वचषकातील पाकिस्तानचे सर्व सामने भारताबाहेर श्रीलंकेत आयोजित करण्यात आले आहेत. पण तरीही पाकिस्तान सरकारने अजब निर्णय घेत, भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

याच मुद्द्यावर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा संघ भारताविरूद्ध खेळायला तयार नसला, तरी भारतीय क्रिकेट संघ (BCCI) आयसीसीच्या प्रोटोकॉलचे पालन करत श्रीलंकेचा प्रवास करणार आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नियोजित वेळापत्रकानुसार कोलंबोला जाईल. संघ तिथे सराव करेल, पत्रकार परिषदेला उपस्थित राहील आणि सामन्याच्या दिवशी वेळेवर स्टेडियममध्ये पोहोचेल. त्यानंतर पाकिस्तानचा संघ न आल्यास 'वॉकओव्हर' केले जाईल.

आयसीसीच्या नियमांनुसार, जर एक संघ नाणेफेकीसाठी (Toss) मैदानात उपस्थित राहिला आणि दुसरा संघ आला नाही, तर सामनाधिकारी (Match Referee) उपस्थित असलेल्या संघाला 'वॉकओव्हर' घोषित करतात. याचा अर्थ भारतीय संघाला सामना न खेळताच २ गुण मिळतील.

बांगलादेशला या स्पर्धेतून बाहेर काढल्याच्या निषेधार्थ पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशचे सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची विनंती बांगलादेशने केली होती, पण ही विनंती ICC ने नाकारली होती, ज्याचा राग पाकिस्तानने व्यक्त केला आहे.

आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) इशारा दिला आहे की, या बहिष्काराचे गंभीर परिणाम पाकिस्तान क्रिकेटला भोगावे लागतील. जागतिक क्रिकेटच्या हितासाठी हा निर्णय योग्य नसल्याचे आयसीसीने म्हटले आहे.

थोडक्यात म्हणजे पाकिस्तान संघ मैदानात उतरणार नसला, तरी भारतीय संघ सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मैदानात जाईल. नाणेफेकीच्या वेळी पाकिस्तानचा कर्णधार मैदानात आला नाही, तर भारताला विजयी घोषित केले जाईल. त्यामुळे क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत.