IND vs PAK : ईशान किशनसह ५ धुरंधरांचा जलवा; पाकिस्तानवर पुन्हा एकदा आली तोंडावर पडण्याची वेळ!

ईशान किशचा बॅटिंगमध्ये धमाका! गोलंदाजीत या तिघांनी दाखवलं मॅजिक अन्....

कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने ६१ धावांनी दिमाखदार विजयाची नोंद करत आपला दबदबा कायम ठेवला.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पहिल्या षटकात अभिषेक शर्माच्या रुपात पहिली विकेट गमावल्यावर ईशान किशन याने जिगरबाज खेळी करत पाकिस्तानी गोलंदाजांचे खांदे पाडले.

ईशान किशनच्या खेळीनं भारतीय संघाच्या विजयाचा भक्कम पाया रचला गेला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेची उपयुक्त खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध टी-२० वर्ल्ड स्पर्धेतील सर्वोच्च १७५ धावसंख्या उभारत तगडे आव्हान दिले.

एका बाजूला पाकिस्तानच्या संघाने फक्त फिरकीची ताद दाखवण्याचा डाव खेळला. तिथं भारतीय संघाने जलदगती गोलंदाज आणि फिरकीचं कमालीच मिश्रण दाखवून देत पाकिस्तानला एकतर्फी मात देण्याची चाल यशस्वी ठरवली. इथं एक नजर टाकुयात हाय-व्होल्टेज लढत एकतर्फी करणाऱ्या टीम इंडियाच्या पाच धुरंधरांच्या कामगिरीवर...

ईशान किशन याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ४० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची धमाकेदार खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पाकिस्तानसमोर विक्रमी टार्गेट सेट केले.

सूर्यकुमार यादवनं ३२ धावांची उपयुक्त खेळी केली. याशिवाय त्याने नेतृत्वाची खास झलक दाखवताना कोलंबोच्या मैदानात फिरकीसाठी अनुकूल वाटत असलेल्या खेळपट्टीवर आपल्या प्रमुख जलदगी गोलंदाजांवर डाव खेळण्याचा धाडसी निर्णय घेतला अन् तो यशस्वी ठरला. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी २-२ विकेट्स घेतल्या.

हार्दिक पांड्या फलंदाजी वेळी आल्यापावली माघारी फिरला. पण गोलंदाजीमध्ये त्याने फलंदाजीतील कसर भरून काढली. हार्दिक पांड्याने पहिले षटक निर्धाव टाकताना साहिबजादा फरहान याला झिरो ठरवले. ही विकेट मॅच टीम इंडियाच्या बाजूने सेट करणारी होती. हार्दिकने या सामनयात ३ षटकात १६ धावा खर्च करत २ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह त्याने पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक १७ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.

जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या षटकात सईम अयूब आणि सलमान अली आगा यांनी तंबूचा रस्ता दाखवत पाकिस्तानसाठी १७६ धावांची लढाई आणखी अवघड केली. बुमराहने २ षटकात १७ धावा खर्च करताना २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.

हार्दिक पांड्याप्रमाणेच अक्षर पटेलही फलंदाजीवेळी खाते उघडू शकला नव्हता. पण त्याने फिरकीची जादू दाखवूत देताना बाबर आझम आणि धोकादायक ठरू शकेल, असे वाटत असलेल्या उस्मान खानची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.