गेल्या काही वर्षांपासून टी-२० क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करत असलेला भारतीय संघ घरच्या मैदानावर होत असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत मोठ्या संकटात सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघाचं सुपर-८ फेरीमधील गणित बिघडलं असून, उपांत्य फेरी गाठण्यासाठीची वाट अवघड झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ कोणत्या परिस्थितीत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठू शकतो, याचा घेतलेला हा आढावा.
दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या दारुण पराभवानंतर आता २६ फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्ध होणारी लढत ही भारतीय संघासाठी ‘करो वा मरो’ अशी असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मोठ्या पराभवामुळे भारतीय संघाचा रनरेट हा -३.८०० एवढा खालावला आहे. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या या लढतीत भारतीय संघाला केवळ विजय मिळवून भागणार नाही, तर त्यात मोठ्या फरकाने विजय मिळवा लागणार आहे.
सध्या भारतीय संघाचा समावेश असलेल्या गटातील वेस्ट इंडिज (+५.३५०) आणि दक्षिण आफ्रिका (+३.८००) यांचा रन रेट भारतापेक्षा खूप सरस आहे. त्यामुळे या गटात तिन्ही संघांचे समान गुण झाल्यास रनरेट निर्णायक ठरणार आहे. तसेच रनरेटच्या आधारावरच उपांत्य फेरीतील दोन संघ निश्चित होणार आहेत. मात्र रन रेटचा विचार करता भारतीय संघ खूप पिछाडीवर आहे.
आता पुढच्या दोन लढतीत जर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २२० धावा जमवल्या तर त्यांना प्रतिस्पर्ध्याला १२० धावांच्या आत रोखावे लागेल, म्हणजेच १०० हून अधिक धावांच्या अंतराने विजय मिळवावा लागेल. तर प्रथम क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाने १५० ते १६० धावांपर्यंत मजल मारल्यास या आव्हानाचा ११ ते १२ षटकांमध्येच पाठलाग करावा लागेल. तसं केल्यासच भारतीय संघाची धावगती सुधारून टीम इंडिया उपांत्य फेरीसाठी दावेदारी सादर करू शकेल.
अहमदाबादमध्ये झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचं गणित बिघडून गेलं आहे. आता या गटात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारत या तिन्ही प्रमुख संघांचे प्रत्येकी ४ गुण झाले. तसेच भारताने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेला पराभूत केले. तसेच दक्षिण आफ्रिकेचा पुढच्या एका सामन्यात पराभव झाला, तर धावगतीच्या आधारावरच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणाऱ्या दोन संघांची नावं निश्चित होणार आहेत. मात्र धावगतीमध्ये सध्या भारतीय संघ खूपच पिछाडीवर पडला आहे.
आता या परिस्थितीत दोन शक्यता समोर येत आहेत. त्यातीत पहिली शक्यता म्हणजे भारतीय संघाने आपल्या पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर भारतीय संघाचे चार गुण होतील. सामान्य स्थितीत उपांत्य फेरीसाठी एवढे गुण पुरेसे असतात. मात्र आता दक्षिण आफ्रिका पुढच्या दोन लढतींपैकी एक लढत गमावली. तर तिन्ही संघांचे प्रत्येकी चार गुण होतील. अशा परिस्थितीत निर्णय हा नेट रनरेटच्या माध्यमातून होईल. मात्र दक्षिण आफ्रिकेने पुढच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर मात्र भारतीय संघासाठीचं गणित अगदी सोपं होणार आहे. तसेच भारतीय संघ सहजपणे उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
मात्र भारतीय संघाला पुढच्या दोनपैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला तर मात्र टीम इंडियासाठी परिस्थिती बिकट बनेल. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पुढच्या सर्व सामन्यात विजय व्हावा म्हणून भारतीय संघाला प्रार्थना करावी लागेल. त्याबरोबरच वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाला विजय मिळवाला लागेल. अशा परिस्थितीत भारत वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचे प्रत्येकी दोन गुण होतीत आणि सरस धावगतीच्या जोरावर उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा संघ ठरेल.