ICC T20 World Cup 2026 ZIM vs AUS : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला धक्का देत यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा उलटफेर घडवून आणला. या पराभवामुळे ‘ब’ गटातील समीकरणे पूर्णपणे बदलली असून गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवण्याची झिम्बाब्वेची ही काही पहिली वेळ नाही. वनडे आणि टी-२० अशा दोन्ही प्रकारांतील वर्ल्ड कप स्पर्धेत मिळून तिसऱ्यांदा त्यांनी ही कमाल साधली आहे. त्यामुळे हा विजय केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नसून ऐतिहासिक ठरतो.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुन्हा कमालीचा योगायोग जुळून येणार?
या निकालामुळे भारतीय चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण वर्ल्ड कप स्पर्धेत ज्या ज्या वेळी झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले, त्या त्या वेळी भारतीय संघाने अखेरीस वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले आहे. हा कमालीचा योगायोग पुन्हा एकदा जुळून येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
झिम्बाब्वेनं दुसऱ्यांदा केली कांगारूंची शिकार! इथं पाहा T20 World Cup इतिहासातील ५ मोठे उलटफेर
१९८३ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला धक्का...
१९८३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत नॉटिंगहॅम येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत क्रिकेट विश्वाला चकित केले होते. कर्णधार डंकन फ्लेचर यांच्या नाबाद ६९ धावांच्या जोरावर झिम्बाब्वेने ६० षटकांत ६ बाद २३९ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर २४० धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव २२६ धावांत आटोपला आणि झिम्बाब्वेने १३ धावांनी विजय साकारला.
या स्पर्धेत कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने झिम्बाब्वेला दोनदा पराभूत केले. याच स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध १७५ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली होती. आणि अखेरीस भारताने पहिल्यांदाच वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकत इतिहास रचला.
२००७ मध्ये पुन्हा जुळून आला तोच योगायोग
पहिल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २००७ साली झिम्बाब्वेने रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला धक्का दिला. १३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात ५ विकेट्स आणि १ चेंडू राखून विजय मिळवला. त्या स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करत पहिल्या टी-२० वर्ल्ड कपवर नाव कोरले.
यंदाही ‘तो’ योगायोग जुळणार?
कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर पुन्हा एकदा झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला नमवले आहे. याआधी ज्या वेळी ऑस्ट्रेलियासमोर झिम्बाब्वेचा ‘चमत्कार’ पाहायला मिळाला, त्या त्या वेळी भारताने वर्ल्ड कप जिंकला आहे. यंदाच्या हंगामातही भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यामुळे झिम्बाब्वे-ऑस्ट्रेलिया सामन्यातील या आश्चर्यकारक निकालानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? हा प्रश्न क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे.