World Test Championship 2025 Final Qualification Scenario After South Africa Win Against Sri Lanka : दक्षिण आफ्रिकेच्या संघानं घरच्या मैदानात सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी आपली दावेदारी आणखी भक्कम केली आहे. भारतीय संघाला पराभूत करून अव्वलस्थानी विराजमान झालेल्या ऑस्ट्रेलियाला खाली खेचत दक्षिण आफ्रिकेचा संघ आता WTC गुणतालिकेत टॉपला पोहचला. दुसरीकडे दोन कसोटी सामन्यातील पराभवानंतर श्रीलंकेचा संघ जवळपास स्पर्धेतून आउट झाला आहे. इथं एक नजर टाकुयात दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत झालेला बदल अन् कोणत्या संघासाठी कसा असेल फायनलचा मार्ग
दक्षिण आफ्रिका WTC फायनलच्या अगदी जवळ
श्रीलंकेविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं १० पैकी ६ विजय, ३ पराभव आणि १ अनिर्णित सामन्यासह ७६ गुण कमावले आहेत. त्यांच्या विजयाची टक्केवारी ६३.३३ टक्के अशी आहे. स्व बळावर फायनल गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला आता फक्त पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत दबदबा कायम राखायचा आहे. पाकिस्तान विरुद्ध दोन्ही कसोटी सामने जिंकण्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ यशस्वी ठरला तर ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठीच्या शर्यतीत टॉपला कायम राहतील.
ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाविरुद्ध जिंकाव्या लागतील एवढ्या मॅचेस
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अव्वलस्थानावर खाली खेचल्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला टीम इंडियाविरुद्ध उर्वरित ३ कसोटी सामन्यापेकी किमान दोन सामने जिंकावे लागतील. एवढेच नाही तर श्रीलंका दौऱ्यावरील दोन सामन्यांच्या मालिकेत त्यांना २-० असा विजय नोंदवावा लागेल. भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली तर ऑस्ट्रेलियाला टीम इंडियापेक्षा पुढे राहण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध किमान एक सामना जिंकावा लागेल.
भारतीय संघासाठी कसे असेल WTC Final चं समीकरण
भारतीय संघाकडे आता फक्त ३ सामने उरले आहेत. या सर्व सामन्यात टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. उर्वरित तिन्ही सामने जिंकून भारतीय संघ तिसऱ्यांदा WTC फायनलमध्ये खेळू शकतो. २ कसोटी सामन्यातील विजय आणि एक सामना अनिर्णित राखूनही टीम इंडियाला फायनलमध्ये एन्ट्री मिळू शकते. पण ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली तर टीम इंडियासाठी डोकेदुखी वाढेल. कारण या परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील दोन्ही सामने अनिर्णित राहिले तरच टीम इंडियाचा फायनलचा मार्ग मोकळा होईल. या परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघाचे विनिंग पर्सेंटेज ५५.२६ टक्के असे बरोबरीत राहिले. तरी मालिका विजयाच्या आधारावर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियावर बाजी मारता येईल.