ऑस्ट्रेलियाच्या संघाने बार्बाडोस येथील मैदानात खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघाचा खेळ तिसऱ्या दिवशीच खल्लास करत पहिला कसोटी सामना जिंकला. हा सामना खराब अंपायरिंगमुळेही चर्चेत आला. मैदानातील पंचाची चूक एक वेळ समजू शकते. पण या सामन्या दरम्यान थर्ड अंपायरने दिलेले काही निर्णय कळीचा मुद्दा ठरल्याचे पाहायला मिळाले. सामन्यानंतर वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार रोस्टन चेज याने खराब पंचगिरीवर राग व्यक्त करताना थेट चुकीचे निर्णय देणाऱ्या अंपायरवरही कारवाई व्हायरला हवी, असे म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आमच्याकडून चूक होते त्यावेळी कठोर शिक्षा केली जाते, पण...
सामन्यानंतर पंचांनी दिलेल्या वादग्रस्त निर्णयाबद्दल वेस्ट इंडिजचा कर्णधाराने नाराजी व्यक्त केली. ज्यावेळी आमच्याकडून चूक होते त्यावेळी कठोर कावाईचा सामना करावा लागतो. पण अधिकाऱ्यांसाठी काही नियम नाहीत. अंपायरचा चुकीचा किंवा वादग्रस्त निर्णय खेळाडूच्या कारकिर्दीवर परिणाम करणारा ठरू शकतो. त्यामुळे चुकीच्या निर्णयासंदर्भात अंपायरिंगसाठीही नियम असायला पाहिजेत. अचारसंहितेचं उल्लंघन केल्यावर खेळाडूला शिक्षा होते. मर्यादा फक्त खेळाडूंना का? चुकीचा निर्णय देणाऱ्या अंपायर्संनाही शिक्षा व्हायला पाहिजे, असे मत व्यक्त करत कॅरेबियन कर्णधारानं खराब पंचगिरीच्या मुद्यावर मनातील राग काढल्याचे पाहायला मिळाले.
ENG vs IND : बर्मिंघम कसोटीत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय फलंदाज! पंतला 'टॉपर' होण्याची संधी
वादग्रस्त निर्णामुळे कॅरेबियन संघ फसला
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात ३ वादग्रस्त निर्णय चर्चेचा विषय ठरले. टेलिव्हिजन अंपायर एड्रियन होल्डस्टॉक यांनी ऑस्ट्रेलियन बॅटर ट्रेविस हेड याला विकेट मागे शाई होपनं घेतलेला कॅच क्लियर नाही, या कारणास्तव नॉट आउट दिले होते. दुसऱ्या दिवसाच्या खेळात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रोस्टन चेजला पायचित स्वरुपात बाद ठरवण्यात आले. चेंडू बॅटची कड घेऊन पॅडवर आदळल्याचे दिसून आल्यामुळे हा निर्णयही वादग्रस्त ठरला. या निर्णयामुळे वेस्ट इंडिज संघ कुठेतरी मागे पडला, अशी चर्चाही रंगताना दिसते.
अंपायरवर कारवाई होऊ शकते का? नियम काय सांगतो? क्रिकेटच्या मैदानात अंपायरचा निर्णय अंतिम असतो. चुकीच्या निर्णयाबद्दल त्याच्यावर कारवाईसंदर्भात कोणत्याही प्रकारची कायदेशीर तरतूद नाही. कारण ही एक मानवी चूक मानली जाते. पण एखादा अंपायर वारंवार चुका करत असेल तर आयसीसी पॅनेल किंवा संबंधित क्रिकेट बोर्ड पंचाच्या कामगिरीची समीक्षा करू शकते. सुमार कामगिरीबद्दल आंतरराष्ट्रीय सामन्यातील पंचाला देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाठवणे, एलिट पॅनलमधून बाहेर काढणे किंवा तात्पुरत्या स्वरुपात निलंबन यासारख्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. भ्रष्टाचार किंवा मॅच फिक्सिंगसारख्या प्रकरणात मात्र अंपायरवर कायदेशी कारवाई केली जाऊ शकते.