Join us

टीम इंडियाने वाहिली रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली 

सिडनी कसोटीला सुरुवात झाल्यावर भारतीय संघाने क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 10:14 IST

Open in App
ठळक मुद्देसिडनी कसोटी सामन्याला सुरुवात झाल्यावर भारतीय संघाने क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहिलीरमाकांत आचरेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू  मैदानात काळी पट्टी बांधून उतरले अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर यांचे बुधवारी निधन झाले होते

सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटीला आजपासून सिडनीत सुरुवात झाली आहे. या सामन्याला सुरुवात झाल्यावर भारतीय संघाने क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहिली. रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंना क्रिकेटचे धडे दिले होते. त्यांच्या प्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने आचरेकर यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. सामन्याला सुरुवात झाल्यावर  भारतीय संघ दंडावर काळ्या रिबीन बांधून मैदानात उतरला. यासंदर्भात बीसीसीआयने एक ट्विट करून माहिती दिली आहे. रमाकांत आचरेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू  मैदानात काळी पट्टी बांधून उतरले आहेत. असे बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर यांचे बुधवारी निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. १९३२मध्ये मालवण येथे जन्मलेल्या आचरेकर यांनी १९४३पासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. १९४५ मध्ये त्यांनी न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबचे प्रतिनिधित्व केले. यासोबतच त्यांनी यंग महाराष्ट्र एकादश, गुलमोहर मिल्स आणि मुंबई पोर्ट संघांचेही प्रतिनिधित्व केले होते. आपल्या कारकिर्दीत केवळ एक प्रथम श्रेणी सामना खेळताना आचरेकर यांनी १९६३-६४मध्ये आॅल इंडिया स्टेट बँकचे प्रतिनिधित्व करताना हैदराबादविरुद्ध सामना खेळला होता. मात्र, क्रिकेटपटूपेक्षा प्रशिक्षक म्हणून त्यांनी एक वेगळीच उंची गाठली. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहिली. स्वर्गातील क्रिकेटविश्वही समृद्ध झाले असेल, कारण तिथे आज आचरेकर सरांची उपस्थिती लाभली आहे. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे मीदेखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरविले. माझ्या आयुष्यातील त्यांचे योगदान मी शब्दांत सांगू शकणार नाही. त्यांनी एक भक्कम पाया रचला आणि त्यावरच मी आज उभा आहे. गेल्याच महिन्यात मी सरांच्या काही विद्यार्थ्यांसह त्यांची भेट घेतली होती. त्या वेळी जुन्या आठवणींना उजाळा देत सरांसोबत खूप चांगला वेळ व्यतीत केला होता. आचरेकर सरांनी आम्हाला कायम सरळ खेळण्याचे आणि सरळ वागण्याचे धडे दिले. त्यांच्या आयुष्यातील एक भाग बनण्याची संधी दिल्याबद्दल आणि त्यांचे प्रशिक्षण घेण्याची संधी दिल्याबद्दल मी आचरेकर सरांचे आभार मानतो. खूप चांगले खेळलात तुम्ही सर आणि तुम्ही जिथे कुठे असाल, तेथे आणखी चांगले प्रशिक्षण तुम्ही द्याल, असे सचिनने आपल्या श्रद्धांजलीत म्हटले.  

टॅग्स :रमाकांत आचरेकरभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय