आयसीसी पुरुष टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे गत चॅम्पियन टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग खडतर झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आता अशा टप्प्यावर पोहोचली आहे की, अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे अत्यावश्यक झाले आहे. एवढेच नाही तर अन्य संघाच्या निकालावर टीम इंडियाचं स्पर्धेतील भवितव्य अवलंबून असेल.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
उर्वरित दोन्ही सामने जिंकूनही टीम इंडियासाठी 'तळ्यात मळ्यात' स्थिती
भारतीय संघ २६ फेब्रुवारीला चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर १ मार्चला कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर वेस्ट इंडिजशी सामना होणार आहे. मात्र हे दोन्ही सामने जिंकले तरी भारताचे सेमीफायनलचे तिकीट निश्चित होईलच, असे नाही.
"इगो बाजूला ठेव अन्..."; भारताला हरवल्यानंतर आफ्रिकन कर्णधार एडन मार्करमच्या विधानाची चर्चा
"हिस्ट्री डिफीट करेंगे; हिस्ट्री रिपीट करेंगे" असा नारा दिला, पण...
भारतीय संघ यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियानं "हिस्ट्री डिफीट करेंगे; हिस्ट्री रिपीट करेंगे" असा नारा दिला होता. टी-२० वर्ल्ड कपच्या आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही संघाने सलग दोन वेळा ही स्पर्धा जिंकलेली नाही. एवढेच नव्हे तर घरच्या मैदानात कुणीही जेतेपद मिरवलेले नाही. हा इतिहास बदलण्यासाठी टीम इंडिया मोठ्या तोऱ्यात मैदानात उतरली. पण आता २०१२ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जे घडलं त्याच चक्रव्युव्हात फसण्याची भीती टीम इंडियाला सतावत आहे.
तो एक पराभव महागात पडला! नेट रनरेटच्या खेळात पाकिस्तानसह ऑस्ट्रेलियानं मारली होती बाजी
२०१२ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघावर सुपर ८ मध्ये एका पराभवामुळे सेमीच्या शर्यतीतून आउट होण्याची वेळ आली होती. त्यावेळी टीम इंडियाने पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय नोंदवत ४ गुण कमावले. पण सुपर ८ मधील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सने पराभूत केल्यानंतर भारतीयसंघाला नेट रनरेटचा फटका बसला होता. यंदाच्या हंगामात भारतीय संघासाठी सुपर ८ चा पेपर अगदी सोपा आहे, असे वाटत होते. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी पराभवाचा धक्का बसल्यामुळे टीम इंडियाच्या सेमीच्या आशा अंधूक झाल्या. त्यात वेस्ट इंडिजच्या संघाने झिम्बाब्वेला १०७ धावांनी पराभूत केल्यामुळे नेट रनरेटचा खेळ टीम इंडियासाठी आणखी अवघड झाला आहे. त्यामुळे पुन्हा २०१२ ची पुनरावृत्ती होण्याची भीती टीम इंडियाला सतावत आहे.
स्पर्धेत टिकण्यासाठी फक्त एक समीकरण टीम इंडियाच्या बाजूनं
♦ समजा वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेनंतर दक्षिण आफ्रिकेलाही पराभूत केले आणि दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेला हरवले, तर तीन संघांचे समान गुण होतील. अशा वेळी निर्णय नेट रनरेटवर होईल.
♦ भारतासाठी सर्वात अनुकूल परिस्थिती अशी असेल की, दक्षिण आफ्रिकेने उर्वरित दोन्ही सामने जिंकावेत. अशावेळी भारताने स्वतःचे दोन्ही सामने जिंकले तर चार गुणांसह सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित होईल आणि नेट रनरेटचा प्रश्न उद्भवणार नाही.