भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात केवळ विजयच मिळवला नाही, तर क्रिकेट जगतात एक नवा इतिहास रचला. ३०१ धावांचे कठीण लक्ष्य यशस्वीपणे गाठून भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २० व्या वेळी ३०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करण्याचा पराक्रम केला. असा विक्रम करणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे.
न्यूझीलंडने दिलेल्या ३०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळी केली. भारताने ४९ षटकांत ४ विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयासह भारताने आपलाच विक्रम अधिक मजबूत केला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ३००+ धावांचे लक्ष्य २० वेळा गाठणारा भारत हा पहिलाच संघ आहे. विशेष म्हणजे, जगातील इतर कोणताही संघ १५ पेक्षा जास्त वेळा ही कामगिरी करू शकलेला नाही.
३००+ धावांचा यशस्वी पाठलाग करणारे टॉप संघ:
| देश | किती वेळा? |
| भारत | २० |
| इंग्लंड | १५ |
| ऑस्ट्रेलिया | १४ |
| पाकिस्तान | १२ |
| न्यूझीलंड / श्रीलंका | ११ |
कोहली-गिलची चमकदार खेळी
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स आणि डेव्हॉन कॉनवे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५० षटकांत ८ बाद ३०० धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून विराट कोहलीने ९३ धावांची झंझावाती खेळी केली, तर युवा फलंदाज शुभमन गिलने ५६ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
किवींविरुद्धचा दुसरा सर्वात मोठा पाठलाग
न्यूझीलंडविरुद्ध भारताने यशस्वीरित्या पाठलाग केलेले हे दुसरे सर्वोच्च लक्ष्य ठरले आहे. यापूर्वी २०१० मध्ये बंगळुरू येथे भारताने ३१६ धावांचे लक्ष्य गाठले होते. आता वडोदरा येथील ३०१ धावांच्या या विजयाने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.