भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ इतिहास रचेल,अशी अपेक्षा आहे. आतापर्यंतच्या टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात एकाही संघाने सलग दोन वेळा ही स्पर्धा जिंकलेली नाही. एवढेच नाही तर घरच्या मैदानात कुणालाही टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचं जेतेपद मिरवता आलेले नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियासंदर्भात शास्त्रींची मोठी भविष्यवाणी
टीम इंडिया छोट्या फॉरमॅटमध्ये सातत्याने मोठा धमाका करत असून यंदाच्या हंगामात सूर्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नवा इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. यंदाच्या हंगामात टीम इंडिया ३०० धावांसह नवा विक्रमही प्रस्थापित करेल, असे भाकित भारताचे माजी प्रशिक्षक आणि विद्यमान समालोचक रवी शास्त्री यांनी केले आहे. टीम इंडियासोबत त्यांनी आणखी एका संघामध्ये हा पल्ला गाठण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर
उधारीची बॅट अन् शतकी रुबाब! क्विंटन डी कॉकनं केली रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी
आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये फक्त तीन संघांनी गाठलाय ३०० धावसंख्येचा आकडा
क्रिकेटच्या छोट्या प्रारुपात धावांची 'बरसात' होताना पाहायला मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का? या प्रारुपात आतापर्यंतच्या इतिहासात फक्त तीन संघच असे आहेत ज्यांनी आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ३०० धावांचा आकडा पार केला आहे. त्यातही ICC चा नियमित सदस्य असणाऱ्या फक्त इंग्लंडचा संघ या यादीत आहे. इतर दोन संघांमध्ये झिम्बाब्वे आणि नेपाळ यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३४४ धावांचा विक्रम हा झिम्बाब्वेच्या नावे आहे.
संजनाचा सवाल अन् शास्त्रींचा रिप्लाय
ICC च्या रिव्ह्यू कार्यक्रमात जसप्रीत बुमराहची पत्नी आणि लोकप्रिय स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिने रवी शास्त्रींना यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कोणता संघ ३०० धावसंख्या उभारु शकतो? असा प्रश्न विचारला होता. यावर शास्त्रींनी याआधी असा पराक्रम करणाऱ्या इंग्लंडला वगळून दोन संघांची नावे सांगितली. ते म्हणाले की, "माझ्या मते ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन संघ ३०० धावांचा आकडा पार करू शकतात. या दोन्ही संघांकडे ज्या प्रकारचे खेळाडू आहेत, ते पाहता हे दोन संघ या बाबतीत आघाडीवर असतील, असे वाटते. जर टॉप ऑर्डरमधील एखाद्या खेळाडूने शतक झळकावले, तर ३०० धावसंख्येचा पल्ला अगदी सहज गाठता येईल" असेही त्यांनी म्हटले आहे.