अहमदाबाद: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये साखळी फेरीतील अटीतटीच्या लढतींनंतर आता खऱ्या अर्थाने 'सुपर-८' फेरीचा थरार सुरू होत आहे. आज आधीच्या टप्प्यातील एक सामना बाकी आहे, परंतू त्याचा या सुपर ८ च्या क्रमावर काही परिणाम होणार नाही. उद्या म्हणजे २१ फेब्रुवारीपासून सुपर ८ च्या सामन्यांना सुरुवात होणार असून २२ फेब्रुवारीला भारत या टप्प्यातील पहिला सामना खेळणार आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
भारतीय संघाने साखळी फेरीत अजेय राहून दिमाखात सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. आता भारतीय संघासमोर दक्षिण आफ्रिकेचे मोठे आव्हान असणार आहे. या फेरीतील भारताचा पहिला सामना २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर भारताच्या वाट्याला साखळी फेरीत जायंट किलर ठरलेला झिम्बाब्बे हा संघ आला आहे. भारताच्या गटातील तिसरा संघ हा वेस्ट इंडिज असणार आहे.
पहिल्या फेरीत भारत अजिंक्य राहिलेला असला तरी पाकिस्तानचा सामना वगळता भारताला इतर चार संघांवर विजय मिळविताना मोठी दमछाक करावी लागली होती. अखेरचा सामना तर मोठी धावसंख्या उभारूनही दुबळ्या नेदरलँडने चांगली टफ दिली होती. अवघ्या १७ धावांनी भारताने हा सामना जिंकला होता. यामुळे सुपर ८ मधील सामन्यांतही भारताला गाफिल खेळून चालणारे नाही.
ग्रुप १ मध्ये भारताचा समावेश
सुपर-८ साठी दोन गट पाडण्यात आले असून, भारताचा समावेश 'ग्रुप १' मध्ये करण्यात आला आहे. या गटात भारतासोबत दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या संघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ या शर्यतीतून बाहेर पडल्याने झिम्बाब्वेला या गटात स्थान मिळाले आहे. तर गट २ मध्ये इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघ आहेत. पैकी इंग्लंड आणि न्यूझीलंड पाकिस्तानला धूळ चारतीलच, परंतू श्रीलंका देखील पाकिस्तानची चांगली धुळधाण करण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
सेमीफायनलचे समीकरण
सुपर-८ मधील प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ ४ आणि ५ मार्च रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा त्यांना नक्कीच मिळेल. पाकिस्तानचा संघ दुसऱ्या गटात (ग्रुप २) असल्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता थेट सेमीफायनल किंवा फायनलमध्ये होण्याची फार कमी शक्यता आहे.