नवी दिल्ली : आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीत आता थरार वाढला आहे. वेस्ट इंडिजने झिम्बाब्वे विरुद्ध मिळवलेल्या १०७ धावांच्या दणदणीत विजयामुळे ग्रुप-१ मधील गुणतालिका पूर्णपणे बदलली आहे. या विजयाचा थेट फटका भारतीय संघाला बसण्याची शक्यता निर्माण झाली असून वेस्ट इंडिज सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सोमवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २५४ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ अवघ्या १४७ धावांत गारद झाला. या मोठ्या विजयामुळे वेस्ट इंडिजचा नेट रनरेट (NRR) थेट +५.३५० वर पोहोचला असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानी आले आहेत. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर असून, भारताचा संघ तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
टीम इंडियाचं समीकरण कसं बिघडलं?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारताचा रनरेट उणे ३.८०० (-३.८००) झाला आहे. वेस्ट इंडिजच्या महाविजयामुळे त्यांचे नेट रनरेट खूपच मजबूत झाले आहे. जर वेस्ट इंडिजने त्यांच्या पुढील दोन सामन्यांपैकी फक्त एक सामना जरी जिंकला, तरी त्यांचा सेमीफायनलमधील प्रवेश जवळपास निश्चित मानला जाईल. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा सध्याचा सर्वोत्तम नेट रन रेट, जो इतर संघांना मागे टाकू शकतो. पण रनरेटचे समीकरण तेव्हाच लागू होईल जेव्हा भारत, द. आफ्रिका आणि विंडीजचे प्रत्येकी सहा गुण होतील. अशावेळी जो संघ रनरेटमध्ये अव्वल असेल तो सेमीफायनलमध्ये जाणार आहे.
भारत कसा पात्र ठरू शकतो?
भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर गणित अगदी स्पष्ट आहे, पण अंमलबजावणी आव्हानात्मक आहे. भारताला आपले दोन्ही उर्वरित सामने केवळ जिंकायचे नाहीत, तर ते मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, जेणेकरून रनरेटमध्ये सुधारणा होईल.
दक्षिण आफ्रिकेची मदत
भारताने ही प्रार्थना करावी लागेल की दक्षिण आफ्रिकेने त्यांचे सर्व सामने जिंकावेत. जर भारत आणि दक्षिण आफ्रिका दोघांनीही त्यांचे उर्वरित दोन-दोन सामने जिंकले, तर वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचे गुण प्रत्येकी २ वरच थांबतील. अशा स्थितीत भारत आणि दक्षिण आफ्रिका थेट सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. जर दक्षिण आफ्रिका आपला एखादा सामना हरली, तर पुन्हा एकदा निर्णय नेट रनरेटवर येईल. सध्या भारताचा रनरेट वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत अत्यंत खराब असल्याने तिथे भारताचा पत्ता कट होऊ शकतो.