Sourav Ganguly, Team India: टीम इंडियाचा माजी भारतीय कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सौरव गांगुली याला त्याच्या कारकिर्दीतील एका गोष्टीची खंत वाटते आणि पश्चात्तापही होतोय. गांगुलीने नोव्हेंबर २००८ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना (कसोटी) खेळला. गांगुलीने ३११ एकदिवसीय आणि ११३ कसोटी सामने खेळले. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण १८,५७५ धावा केल्या. सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३८ शतके केली. त्यासोबतच, त्याने एकदिवसीय सामन्यात ७२ अर्धशतके आणि कसोटी क्रिकेटमध्ये ३५ अर्धशतके केली. इतकी समृद्ध कारकीर्द असूनही त्याला निवृत्तीच्या १७ वर्षानंतरही एक गोष्ट खटकतेय.
१७ वर्षांनंतर व्यक्त केल्या भावना
गांगुली 'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, "मी अनेक वेळा शतक पूर्ण करण्यापासून चुकलो. मला अधिक धावा करायला हव्या होत्या. मी अनेक वेळा ९० आणि ८० धावांच्या खेळी केल्या पण त्याचे शतकात रूपांतर करता आले नाही. तसे झाले असते तर माझ्या नावावर ५०हून अधिक शतके असती." गांगुलीची कारकिर्द पाहता त्याने ३० वेळा ८०ची धावसंख्या गाठली पण शतक पूर्ण करण्यापूर्वीच तो बाद झाला. जर तो या डावांचे शतकांमध्ये रूपांतर करू शकला असता, तर त्याच्या नावावर ५०हून अधिक शतके झाली असती.
एकटा असताना जुन्या इनिंग्स पहायला आवडतात!
गांगुली एकटा असताना त्याला त्याचे सामने पाहायला आवडतात. हे त्याला आठवण करून देते की तो अधिक शतके करण्याच्या किती जवळ होता. तो म्हणतो, "मी एकटा असताना माझे (फलंदाजीचे) व्हिडिओ पाहतो. माझी पत्नी घरी नसते, कारण मुलगी सना लंडनमध्ये असल्याने ती कधीकधी तिच्यासोबत राहते. मी YouTube वर जातो आणि माझी खेळी पाहतो आणि स्वतःला सांगतो- अरे, मी पुन्हा ७० धावांवर बाद झालो. मला शतक करायला हवे होते. पण आता ते बदलू शकत नाही."