Rohit Sharma funny reply, Axar Patel missed Hat trick, Champions Trophy 2025 IND vs BAN: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला ६ गडी राखून पराभवाची धूळ चारली. भारताविरूद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने तौहिद हृदयचे शतक आणि जाकर अलीच्या अर्धशतकाच्या बळावर ४९.४ षटकांत सर्वबाद २२८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलने नाबाद शतक आणि रोहित, राहुलच्या दमदार खेळींच्या जोरावर भारताने हा सामना ४६व्या षटकातच जिंकला. दमदार शतक ठोकणाऱ्या शुबमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आले. या सामन्यात अक्षर पटेलला हॅटट्रिकची संधी होती, पण रोहित शर्माने झेल सोडल्यामुळे ती संधी हुकली. या मुद्द्यावर सामना संपल्यावर रोहितने गमतीशीर उत्तर दिले.
अक्षर पटेल बांगलादेशच्या डावातील ९ व्या षटकात गोलंदाजीला आला. त्याने दुसऱ्या चेंडूवर तांझिद हसनला तर तिसऱ्या चेंडूवर मुशफिकर रहिमला यष्टीरक्षक लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. हॅटट्रिक टेंडूवर त्याने जाकेर अलीलाही फसवलं पण स्लिपमध्ये रोहितने झेल सोडला आणि अक्षरची हॅटट्रिक हुकली. या प्रकारावर बोलताना रोहित म्हणाला, "तो झेल खूपच सोपा होता. मी आतापर्यंत जितकी फिल्डिंग केलीय, त्यात हा सोपा झेल होता. त्यामुळे मी स्वत:वरच खूप नाराज झालो. म्हणून जोरात मैदानावर हात आपटला. मी स्लिपमध्ये होतो त्यामुळे मी असे झेल पकडायला हवेत. तो झेल सोडल्याची शिक्षा म्हणून मी अक्षरला उद्या डिनरसाठी बाहेर घेऊन जाईन."
"गोलंदाजांनी आमच्यासाठी विजयाची चांगली संधी निर्माण केली आणि फलंदाजांनी त्यावर योग्य कामगिरी करत निकाल आणला. सामन्यात काही वेळा अनपेक्षित भागीदारी होतात. पण या गोष्टींकडे फार लक्ष न देता संघ म्हणून खेळायला हवे. त्याने नक्कीच फायदा होईल," असेही रोहित म्हणाला.
दरम्यान, भारतीय संघाने गोलंदाजीत अप्रतिम सुरुवात केली होती. अवघ्या ३५ धावांत बांगलादेशचे ५ गडी बाद झाले होते. पण तौहिद हृदय आणि जाकेर अली या दोघांच्या भागीदारीने बांगलादेश सावरला. हृदयने ११८ चेंडूत १०० धावा केल्या तर जाकेर अलीने ११४ चेंडूत ६८ धावा केल्या. या दोघांमुळे बांगलादेशला २२८ धावा करता आल्या. भारताने २२९ धावांचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली. रोहित शर्माने ४१ धावा केल्या. विराट कोहलीने २२ धावा केल्या तर लोकेश राहुलने नाबाद ४१ धावांची खेळी केली. शुबमन गिल सलामीला आणि नाबाद राहिला. त्याने १२९ चेंडूत १०१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.