आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा अश्वमेध घोडा वेगाने दौडत सुटला आहे. टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या २७ व्या सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारत एक मोठा विश्वविक्रम रचला. भारताने आयसीसी (ICC) स्पर्धेत सलग १६ सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी हा मुकूट ऑस्ट्रेलियाच्या अर्थात कांगारूंच्या माथ्यावर होता. तो आता भारताच्या डोक्यावर झळकणार आहे.
कांगारूंना टाकलं मागेल -
भारतीय संघाने २०२४ ते २०२६ या कालावधीत खेळल्या गेलेल्या आयसीसी स्पर्धांमध्ये हा महापराक्रम केला. महत्वाचे म्हणजे, यापूर्वी हा विक्रम बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने आयसीसी स्पर्धांमध्ये सलग १५, १४ आणि १३ विजयांच्या तीन वेगवेगळ्या मालिका केल्या होत्या; मात्र भारताने आता १६ विजयांचा टप्पा ओलांडून ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे.
भारताच्या विजयाची घोडदौड -
भारताची ही विजयी घोडदौड थक्क करणारी आहे. यापूर्वी २०१२-२०१४ दरम्यान भारताने सलग १२ सामने जिंकले होते. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपमध्येही भारताने सलग १० सामने जिंकले होते. मात्र, दुर्दैवाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता आणि अनेक चाहत्यांची मने तुटली होती.
मात्र, आताच्या वर्ल्ड कपमधील भारताचा फॉर्म बघता विजयाची ही मालिका (Streak) अधिक मोठी होईल, असे वाटते.
पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव -
कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तानसोबत रविवारी खेळल्या गेलेल्या हाय-व्होल्टेज सामन्या संदर्भात बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने पाकिस्तानचा अक्षरश: धुव्वा उडवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ईशान किशनच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात १७५ धावा करत पाकिस्तानसमोर १७६ धावांचे टार्गेट सेट केले होते. या टार्गेटचा सामना करताना पाकिस्तानचा डाव ११४ धावांवर संपला आणि भारताने ६१ धावांनी विजय मिळवला.