टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये फलंदाजांनी तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत इंग्लंडसमोर विक्रमी २५४ धावांचे टार्गेट सेट केले. त्यानंतर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी धक्क्यावर धक्के दिले. धावांचा बचाव करताना हार्दिक पांड्याने आपल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टला तंबूचा रस्ता दाखवला. पाचव्या षटकात बुमराह आपले पहिले षटक घेऊन आला. त्यानेही तोच पॅटर्न दाखवला. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकला पहिल्याच चेंडूवर बुमराहनं तंबूचा रस्ता दाखवला. या विकेटसह जसप्रीत बुमराहनं आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० विकेट्सचा डावही साधला.
विकेट बुमराहची, पण कमाल अक्षर पटेलची
जसप्रीत बुमराहने ज्या विकेटसह मैलाचा पल्ला गाठला ती विकेट मिळवून देण्यात अक्षर पटेलनं मोलाचा वाटा उचलला. त्याने मागच्या बाजूला धावत जाऊन अशक्यप्राय वाटणारा झेल टिपला. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतीलच नव्हे तर क्रिकेटच्या मैदानातील तो एक अप्रतिम कॅच ठरला. सोशल मीडियावर जसप्रीत बुमराहच्या विक्रमी कामगिरीसह अक्षर पटेलच्या फिल्डिंगच्या जादूची चर्चा रंगताना दिसत आहे.
फिल सॉल्ट पाठोपाठ हॅरी ब्रूक स्वस्तात माघारी
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने संजू सॅमसन, शिवम दुबे आणि ईशान किशनच्या शानदार खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ७ बाद २५३ धावा केल्या. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या नॉकआउटमधील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. सलामीवीर फिल सॉल्टला हार्दिक पांड्याने अवघ्या ५ धावांवर माघारी धाडले. कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या हॅरी ब्रूकची विकेट घेत जसप्रीत बुमराहनं टीम इंडियाच्या वाटेतील मोठा अडथळा दूर केला. तो ६ चेंडूत ७ धावांची खेळी करून बाद झाला.