स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्जची दमदार अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजीत श्रेयंका पाटीलच्या गोलंदाजीतील ब्युटीच्या जोरावर भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियन मैदानात इतिहास रचला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने अॅडलेड येथील ओव्हलच्या मैदानातील तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात १७६ धावांचा बचावर करत तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलियन मैदानात भारतीय संघाने जिंकलेली ही फक्त दुसरी द्विपक्षीय मालिका ठरली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अखेर १० वर्षांचा दुष्काळ संपला
या आधी भारतीय संघाने २०१६ मध्ये मिताली राजच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानात २-१ असा मालिका विजयाचा डाव साधला होता. दहा वर्षांचा दुष्काळ संपवत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन मैदानात नवा इतिहास रचला आहे. दहा वर्षांपूर्वीच्या दौऱ्यात भारताने पहिला सामना पाच विकेट्सनी जिंकला, तर दुसरा सामना १० धावांनी (DLS पद्धतीनुसार) जिंकत मालिका आपल्या नावावर केली होती.
स्मृती जेमीमाची अर्धशतके, दोघींनी शतकी भागीदारीसह केली ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई
पहिल्यांदा फलंदाजी करताना स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या १२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १७६ धावा करत यजमान ऑस्ट्रेलियन संघासमोर १७७ धावांचे टार्गेट सेट केले होते. भारताकडून स्मृती मानधना हिने ५५ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८२ धावांची दमदार खेळी केली. तिच्याशिवाय जेमिमा रॉड्रिग्जनं ४६ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ५९ धावांची उपयुक्त अर्धशतकी खेळी केली.
गोलंदाजीत श्रेयंका पाटीलसह श्री चरणीनं दाखवली फिरकीची जादू
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. श्रेयंका पाटील हिने दुसऱ्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर भारतीय संघाला जॉर्जिया वॉलच्या रुपात पहिले यश मिळवून दिले. रेणूका सिंह ठाकूर हिने बेथ मूनीला अवघ्या ६ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. एलिसा पेरीच्या रुपात श्रेयंकाने आपले दुसरे आणि संघासाठी तिसरे यश मिळवत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. संघाला धक्क्यावर धक्के बसत असताना ॲशली गार्डनर हिने अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला मॅचमध्ये आणण्यासाठी जोर लावला. पण अरुंधती रेड्डीनं ५७ धावांवर तिच्या खेळीला ब्रेक लावत भारतीय संघाच्या मालिका विजयातील मोठा अडथळा दूर केला. ती परतल्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात १५९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. स्मृती आणि जेमिमाच्या अर्धशतकानंतर गोलंदाजी श्रेयंका आणि श्री चरणी या दोघांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. अरुंधती रड्डीनं २ तर रेणुकाला एक विकेट मिळाली.