दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला केवळ मैदानातील कामगिरीच नाही, तर वेळेच्या नियोजनाचाही मोठा फटका बसला आहे. टॉस हारल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघ निर्धारित वेळेत आपली षटके पूर्ण करण्यात अपयशी ठरला, ज्यामुळे शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना मोकळे रान मिळाले.
आयसीसीच्या नियमांनुसार, डावातील २० षटके पूर्ण करण्यासाठी ८५ मिनिटांचा वेळ दिला जातो. मात्र, टीम इंडियाचा ओव्हर रेट इतका संथ होता की, ८५ मिनिटे संपली तरी भारतीय संघ १९ वे षटकही पूर्ण करू शकला नव्हता.
या संथ ओव्हर रेटमुळे अंपायर्सनी भारताला मैदानावरच शिक्षा सुनावली. या नियमानुसार भारताला डावातील शेवटच्या षटकासाठी ३० यार्ड सर्कलच्या बाहेर ५ ऐवजी केवळ ४ क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी मिळाली. म्हणजेच, ५ खेळाडू ३० यार्ड सर्कलच्या आत उभे करावे लागले.
बाउंड्री लाईनवर एक क्षेत्ररक्षक कमी असल्याचा पूर्ण फायदा आफ्रिकेच्या फलंदाजांनी उचलला आणि २० व्या षटकात तब्बल २० धावा वसूल केल्या. या अतिरिक्त २० धावांमुळे दक्षिण आफ्रिकेने १८७ धावांचे विशाल लक्ष्य उभे केले, जे भारताच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. या वाढलेल्या २० रन्समुळे भारतावर दबाव वाढला. याचा परिणाम फलंदाजांवर झाला आणि त्यांनी फटकेबाजी करण्याच्या नादात आपल्या विकेट गमावल्या.
बचाव कार्यात बुमराह एकाकीजसप्रीत बुमराहने ४ षटकात केवळ १५ धावा देऊन ३ बळी घेतले, परंतु हार्दिक पंड्या (४५ धावा) आणि वरुण चक्रवर्ती (४७ धावा) खूप महागडे ठरले. पांड्याला नेदरलँडच्या संघानेही चांगलेच झोडपले होते. हार्दिक पांड्याने तीन ओव्हरमध्ये ४० रन्स दिले होते.