टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तानने भारतासोबत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बीसीसीआयचे नाही तर पीसीबी आणि आयसीसीचे मोठे नुकसान होणार आहे. पाकिस्तान भारतीय संघाविरोधात खेळणार नसल्याने भारताला आपसुकच २ गुण मिळणार असले तरीही भारतीय संघाला गाफिल राहून चालणार नाहीय. कारण पाकिस्तान केव्हाही दगा देऊ शकतो. जरी पाकिस्तान संघ आला नाही तरीही भारतीय संघाला मैदानावर उतरावेच लागणार आहे.
पाकिस्तान १५ फेब्रुवारीच्या सामन्यावर बहिष्कार टाकला, तर भारतीय संघाला कोणतीही मेहनत न करता पूर्ण २ गुण दिले जातील. पण त्यासाठी भारताला श्रीलंकेला जावे लागणार आहे. तसेच खेळाच्या जर्सीमध्ये मैदानावर उतरावे लागणार आहे. नाहीतर भारतालाही गुण मिळणार नाहीत.
मैदानात काय घडणार?
आयसीसीच्या नियमांनुसार, सामना रद्द झाला तरी त्याचे गुण देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. पाकिस्तानने बहिष्कार टाकला तरी भारतीय संघाला कोलंबोमधील मैदानावर टॉसच्या वेळी उपस्थित राहावे लागेल. भारतीय कर्णधार मैदानात असेल, पण जर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा टॉससाठी आला नाही, तर मॅच रेफरी अधिकृतपणे प्रतीक्षा करतील. पाकिस्तानचा संघ मैदानात न उतरल्यास, मॅच रेफरी 'वॉकओव्हर' अंतर्गत भारताला विजयी घोषित करतील आणि २ गुण भारताच्या खात्यात जमा होतील.
पाकिस्तानवर दुहेरी टांगती तलवार
केवळ भारताला गुण मिळतील असे नाही, तर पाकिस्तानला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. आयसीसीकडे अधिकृत स्पर्धा कराराचा भंग केल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर प्रचंड आर्थिक दंड लावण्याचे अधिकार आहेत. ब्रॉडकास्टरच्या नुकसानीची भरपाई म्हणून पाकिस्तानच्या आयसीसी रेव्हेन्यूमधून कपात केली जाऊ शकते.
भारताचा श्रीलंका दौरा निश्चित
पाकिस्तानच्या भूमिकेचा भारतीय संघाच्या प्रवासावर कोणताही परिणाम होणार नाही. भारतीय संघ ठरल्याप्रमाणे श्रीलंकेत जाईल आणि आपल्या सराव सत्रांमध्ये सहभागी होईल. "आम्ही आयसीसीच्या वेळापत्रकाचे पालन करू. समोरचा संघ मैदानात येतो की नाही, हा आमचा विषय नाही," अशी भूमिका बीसीसीआयच्या गोटातून समोर येत आहे.